उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल:शिंदेंनी खासदार संजय पाटलांची भेट घेताच, 'मातोश्री'नेही आपले विश्वासू पाठवले
![]()
मुंबईतील एका राजकीय भेटीने राज्याच्या राजकीय वर्तुळात एक नवा चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तातडीने हालचाल करत आपले विश्वासू संजय पाटील यांच्या भेटीला पाठवले. तसेच स्वतःही त्यांच्याशी संवाद साधला. परिणामी, या भेटीगाठींना केवळ सहानुभूतीचा भाग मानायचे की त्यामागे मोठे राजकीय गणित आहे, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. यासंबंधीच्या घडामोडींची सुरुवात झाली ती खासदार संजय दिना पाटील यांच्या कुटुंबातील एका दुर्घटनेमुळे. काही दिवसांपूर्वी संजय पाटील यांच्या पत्नीचा अपघात झाला. त्यांच्यावर सध्या मुंबईतील मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी वेळातला वेळ काढून स्वतः रुग्णालयात जाऊन पाटील यांची भेट घेतली. त्यांनी त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि काही काळ दोघांमध्ये चर्चा देखील झाली. ही भेट मानवी संवेदनांमधून झालेली असली तरी तिचे राजकीय पडसाद उमटायला वेळ लागला नाही. राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा राज्यात आधीपासूनच ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगलेली आहे. शिंदे गटाकडून विरोधी गटातील काही नेत्यांना आपल्या बाजूला ओढण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशा परिस्थितीत शिंदे यांनी ठाकरे गटातील खासदाराची भेट घेतल्याने या चर्चांना अधिकच बळ मिळाले. राजकीय निरीक्षकांच्या मते, ही भेट केवळ शिष्टाचारापुरती मर्यादित नव्हती. तिच्यामागे काही संकेत दडलेले असू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरे व आमदार आदित्य ठाकरे यांनीही विलंब न करता पावले उचलली. त्यांनी स्वतः फोन करून संजय दिना पाटील यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या पत्नीच्या तब्येतीची चौकशी केली. एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या विश्वासू नेत्यांना पुढे करत परिस्थितीवर लक्ष ठेवले. आमदार मिलिंद नार्वेकर आणि सचिन अहिर यांनी थेट रुग्णालयात जाऊन पाटील यांची भेट घेतली. या सर्व हालचालींमुळे ठाकरे गटानेही आपल्या नेत्यांशी संपर्क दृढ ठेवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः सध्याच्या राजकीय वातावरणात, पक्षांतर्गत हालचाली आणि नेत्यांचे स्थलांतर ही सामान्य बाब बनली आहे. त्यात प्रत्येक नेत्याची निष्ठा कायम राखणे हे दोन्ही गटांसाठी महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळेच या भेटींचा अर्थ केवळ वैयक्तिक सहानुभूतीपुरता मर्यादित राहत नाही. वैयक्तिक नातेसंबंध मजबूत करण्यावर भर उल्लेखनीय बाब म्हणजे शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये सध्या ‘सॉफ्ट पॉवर’चा वापर सुरू आहे. या प्रकरणी हे दोन्ही गट थेट आरोप-प्रत्यारोप किंवा राजकीय हल्ल्यांऐवजी वैयक्तिक नातेसंबंध मजबूत करण्यावर भर देत आहेत. अशा भेटींमधून एकीकडे सहानुभूती दाखवली जाते, तर दुसरीकडे आपला प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळेच या भेटींचे महत्त्व अधिक वाढले आहे.
