मंत्रिमंडळ निर्णय:सोलापुरात नवीन शासकीय अभियांत्रिकी काॅलेज; राज्यातील 24 आश्रमशाळांच्या श्रेणीमध्ये वाढ
![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (दि. ५ मे) झालेल्या बैठकीत शिक्षण व तंत्रशिक्षण क्षेत्रासाठी ३ महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. २४ आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यासोबतच सोलापूर व तुळजापूरमधील तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचावणारे इतर दोन महत्वाचे निर्णयही मंत्रिमंडळाने घेतले. पहिल्या निर्णयानुसार दुर्गम भागात आदिवासी विद्यार्थ्यांची (विशेषतः मुलींची) शिक्षणातील गळती रोखण्यासाठी ५ प्राथमिक आश्रमशाळांना माध्यमिकचा (८वी-१०वी), तर १९ माध्यमिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालयाचा (११वी-१२वी) दर्जा दिला आहे. तसेच माध्यमिकसाठी ३० शिक्षक व २५ कर्मचारी, तर १९ उच्च माध्यमिकसाठी १४८ शिक्षकांची नवी पदे निर्माण केली जाणार आहेत. तुळजापूर संस्थानचे कॉलेज आता शासनाकडे… धाराशिवचे मंदिर संस्थान संचालित हे महाविद्यालय उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हस्तांतरित केले. ११८ नव्या पदांनाही मान्यता दिली. सोलापूर तंत्रनिकेतनला अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा सोलापूर शासकीय तंत्रनिकेतनला आता ‘शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था’ (जीआयईटी) असा दर्जा दिला आहे. येथे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून एआय आणि मशीन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स, आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हे तीन नवे पदवी अभ्यासक्रम सुरू होतील. (प्रत्येक शाखेत १८० विद्यार्थी). यासाठी १५७ कोटींचा निधी आणि ७७ नव्या पदांना (३९ शिक्षक आणि ३८ शिक्षकेतर) मंजुरी दिली आहे. जवळपास ६० वर्षापासून सोलापुरात अभियांत्रिकी महाविद्यालयाची मागणी होत होती, आता पूर्ण झाली. ग्रामीण भागात ‘एआय’ शिक्षण, ड्रॉप आऊटलाही ब्रेक सोलापूर व तुळजापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांसंबंधी निर्णयामुळे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ‘एआय’ व ‘मशिन लर्निंग’सारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचे शिक्षण सरकारी फीमध्ये उपलब्ध होईल. जागतिक दर्जाचे रोजगारभिमुख तंत्रज्ञान शिकता येईल. आश्रमशाळेतच ११ वी व १२ वीमुळे आदिवासी मुलींच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला.
