क्यूआर कोडद्वारे आता पाेलिसात करा तक्रार:‘मुलींची सुरक्षा'' प्रणाली मूर्तिजापूर येथून प्रारंभ; ओळख राहणार गोपनीय
![]()
प्रतिनिधी | मूर्तिजापूर महिला, युवती व मुली यांना अन्याय, अत्याचार, त्रास देणे, पाठलाग करणे अशा अनेक अप्रिय घटनांना तोंड द्यावे लागते. परंतु त्या भीतीपोटी किंवा पालक शिक्षण अपूर्ण राहू देतात अथवा नसती कटकट नको म्हणून याबाबत तक्रार देण्याचे टाळतात. त्यामुळे अनेक असामाजिक समाजकंटक आणि नराधम यांची हिंमत वाढते व नको त्या घटना घडत असतात. या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर येथील ठाणेदार अजित जाधव यांनी ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून महिला,युवती व मुलींना आपली तक्रार नोंदवण्याची प्रणाली बझीका इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून विकसित करून तक्रारदाराचे नाव गोपनीय राहील व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. महिला व युवतींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर अंकुश बसावा आणि वाईट प्रवृत्तींवर धाक निर्माण होण्याकरता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत प्रभावी पाऊल उचलले आहे. जिल्हा पोलस अधीक्षक अर्चित चांडक यांना याबाबत संपूर्ण कल्पना देण्यात आली होती. त्यांच्याकडून हिरवी झेंडी मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मुलींची सुरक्षा’ या नावाची क्यूआर कोड प्रणाली ‘बझीका इंटरनॅशनल’ कंपनीचे तांत्रिक सहकार्य घेण्यात आले. याबाबतची संपूर्ण माहिती मूर्तिजापूर येथील अभियंता वैभव संजय कडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपक्रमांतर्गत शहरातील शाळा, महाविद्यालये, बस स्थानक, रेल्वे स्थानक, खासगी शिकवणी वर्ग तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. कोणत्याही महिला किंवा युवतीला त्रास होत असल्यास त्या आपल्या मोबाइलद्वारे हा ‘क्यू आर’ कोड स्कॅन करून तत्काळ तक्रार नोंदवू शकतात. तक्रारदाराचे नाव व वैयक्तिक माहिती पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येणार असल्याने महिलांना निर्भयपणे तक्रार करता येणार आहे. या प्रणालीत ‘पॅनिक बटन’चीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत हे बटन दाबताच संबंधित पोलीस यंत्रणा अलर्ट होऊन काही मिनिटांतच पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचून पीडितेला मदत व सुरक्षा प्रदान करणार आहेत. त्यामुळे ही प्रणाली महिलांसाठी संजीवनी ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होणार ^या उपक्रमामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होणार असून, पोलिसांच्या तपास प्रक्रियेलाही गती मिळणार आहे. मात्र, या प्रणालीचा कोणताही गैरवापर केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. – अर्चित चांडक , पोलिस अधीक्षक.
