पुण्यात महिला असुरक्षित, गृहमंत्र्यांनी कानावर हात ठेवलेत का?:उद्धव ठाकरेंच्या भगिनी कीर्ती फाटक यांचा संताप; पोलिस आयुक्तांची घेतली भेट
![]()
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भगिनी कीर्ती फाटक यांनी पुणे पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांची भेट घेऊन नसरापूर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना कीर्ती फाटक म्हणाल्या, आम्ही शिवसेना ठाकरे गटाच्या महिला म्हणून नाही तर पुण्यातल्या महिला म्हणून स्वतःला असुरक्षित महिला समजत आहोत. कारण आत्ताच नुकतीच जी घटना घडली आहे नसरापूरची त्याच्या संबंधी मी पोलिस कामिशनर साहेबांना भेटायला आले होते. त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले आहे की महिला एवढ्या असुरक्षित कशा झाल्या आहेत पुण्यात? पूर्वी असे नव्हते. आता रोज काहीतरी घडत आहे. मोठ्या वयाची बाई असेल किंवा लहान मुलगी असेल सगळ्यांना कुठेही सुरक्षित वाटत नाहीये. कायद्याचे भय राहिले नाही. आधी गुन्हे केलेले असले तरी तो राजरोसपणे बाहेर फिरत आहे. पुन्हा नवीन गुन्हा करायला मोकळा. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. पुढे बोलताना कीर्ती फाटक म्हणाल्या, आम्हाला सुरक्षित जगायचे आहे आणि ही जबाबदारी पोलिस कामिशनर साहेबांची आहे. आणि तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडण्यासाठी काय उपाययोजना करत आहात? हे आत्ता आम्ही त्यांना विचारले. त्यावर त्यांनी आम्हाला सांगितले की दामिनी पथक आहे, सुरक्षा दीदी आहे, 112 नंबर डायल केला की लगेच मदत मिळते. मी म्हटले की अहो साहेब ती मदत मिळेपर्यंत घटना घडून गेलेली असते. त्याच्यावर ठोस उपाययोजना पाहिजे. तुमच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाढ व्हायला पाहिजे. सध्या पोलिस स्टेशन वाढले आहेत, पण रस्त्यावर फिरणारी सुरक्षा पथक वाढली पाहिजेत आणि त्यात महिला वाढल्या पाहिजेत, अशी मागणी आम्ही केली आहे. कीर्ती फाटक म्हणाल्या, सगळीकडे सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. सध्याच्या विकृती वाढण्यामागे सोशल मीडिया आहे. आपण आपल्या मुलांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आपल्या मुलांनी कोणापासून सावध राहिले पाहिजे, आपले मुलं सुद्धा कसा वागावा हे आपण घरीच प्रशिक्षण दिले पाहिजे. आपल्या घरात सुद्धा कोणी विकृत वागत नाही न हे देखील आपण पाहिले पाहिजे. तसेच गृहमंत्री अपयशी ठरले का? असे विचारले असता कीर्ती फाटक म्हणाल्य, गृहमंत्री अपयशी ठरले आहेत हे वाक्यच आता मला बोलावे वाटत नाहीये. म्हणजे मला आता त्यावर बोलावेच वाटत नाही. किती निदर्शने करायची, किती मोर्चे काढायचे, किती आरडाओरडा करायचा, त्याच्यावर कुठे काय होत आहे? कारण गृहमंत्र्यांनी कानावर हात ठेवले असतील, डोळ्यावर हात ठेवले असतील तर आपण बोलून, आपण ओरडून काहीच होणार नाहीये. त्यामुळे मला त्यांना काहीच बोलायचे नाही. आता लोकच बघत आहेत, तेच आता त्यांचे मत ठरवत आहेत.
