भाजपला पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरीत यश:पुणे कार्यालयात भारत मातेचे पूजन करून आनंद व्यक्त
![]()
भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानिमित्त पुणे शहर भाजपने आनंद व्यक्त केला. शहर कार्यालयात भारत मातेचे पूजन करून हा विजय साजरा करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. पश्चिम बंगालच्या जनतेला परिवर्तनाची अपेक्षा होती आणि हा विजय त्याच प्रयत्नांचे फलित आहे. आसाम आणि पुद्दुचेरीमध्येही पक्षाला चांगले यश मिळाले आहे. नसरापूर येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर भाजपने कोणताही विजयोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पक्ष कार्यालयातच भारत मातेचे पूजन आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हा विजय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, असे धीरज घाटे यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पश्चिम बंगालची प्रसिद्ध झालमुरीचा आस्वाद घेतला. सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, पुनीत जोशी, राजेंद्र काकडे, देवेंद्र वडके, श्याम सातपुते, जयंत भावे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांना ‘कथाकार सन्मान’ प्रदान सोहळा मराठी साहित्य विश्वातील कथा या साहित्य प्रकारात शंकर पाटील, द.मा. मिरासदार आणि व्यंकटेश माडगूळकर यांचे अतुल्य योगदान आहे. या तीन दिग्गज कथाकारांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्मरण तीन कथाकारांचे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक ५ मे २०२६ रोजी करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांना ‘कथाकार सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यानिमित्त शंकर पाटील, द.मा. मिरासदार आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथांचे अभिवाचन होणार असून यामध्ये अमृत सामक, अक्षय प्रभाकर वाटवे आणि श्रीधर कुलकर्णी सहभागी होणार आहेत.हा कार्यक्रम मंगळवार दिनांक ५ मे २०२६ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता, स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन, कर्वे रस्ता, पुणे येथे होणार आहे.
