संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानावर भर देणे आवश्यक:व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांचे शेतकऱ्यांना आवाहन
![]()
प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) या संस्थेचा ५० वा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी संस्थेच्या सुवर्णप्रवासाचा आढावा सादर केला. वाढती स्पर्धा, बाजारातील आव्हाने लक्षात घेता संशोधन, संकरित वाण, जैविक उत्पादने आणि आधुनिक तंत्रज्ञानावर अधिक भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच इतर राज्यांमध्ये विस्तार करण्याची संधी असल्याचेही त्यांनी सांगितले. सोहळ्यास आ. रणधीर सावरकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, संचालक वल्लभराव देशमुख व डॉ. रणजीत सपकाळ, महानगरपालिकेचे आयुक्त सुनील लहाने, शेतकरी नेते प्रकाशराव पोहरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे महाबीजचे रोप, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. संजय गरकल, उपजिल्हाधिकारी तथा महाव्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले. नंतर महाबीजच्या गेल्या ५० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा सादर करण्यात आला. संस्थेने शेतकरी हितासाठी राबवलेल्या विविध योजना, उच्च दर्जाचे बियाणे उत्पादन, संशोधन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आभार बीज परीक्षण अधिकारी राजेश पाटील यांनी मानले. महाबीजच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमास शेतकरी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. दर्जेदार बियाणे, विश्वासार्ह उत्पादने आणि शाश्वत शेतीसाठी महाबीजची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे आमदार सावरकर यांनी नमूद केले. तसेच नैसर्गिक व सेंद्रिय शेती, संशोधनाधारित वाण आणि शेतकऱ्यांना थेट लाभ देणाऱ्या धोरणांवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. कुलगुरू डॉ. गडाख यांनी महाबीजच्या योगदानामुळे शेती उत्पादन वाढीस मोठा हातभार लागल्याचे सांगितले. कृषी विद्यापीठ व महाबीज यांच्यातील समन्वयामुळे संशोधनातून विकसित वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
