जिल्ह्याच्या कृषी, औद्योगिक क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज:सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे महाराष्ट्रदिनी प्रतिपादन, मान्यवरांचा गाैरव
![]()
प्रतिनिधी | अमरावती ‘शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी, यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि उद्योग क्षेत्राचा विकास करून जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याने या दोन्ही क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर भर द्यावा ,’ असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या निमित्ताने पोलिस कवायत मैदानात मुख्य शासकीय समारंभ झाला. या वेळी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, प्रभारी विभागीय आयुक्त अजय लहाने, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलिस अधीक्षक विशाल आनंद आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले, शेती व उद्योग क्षेत्रात आधुनिकतेची कास धरीत जिल्ह्याने महत्त्वपूर्ण पावले उचलली. राज्य शासनाने पीक कर्जासाठी २ लाख पर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदानही दिले जाणार असून, ही प्रक्रिया सुरू होणार आहे. मोर्शी, वरुड येथील सिट्रस इस्टेटमध्ये एआय आधारित तंत्रज्ञान राबवले जाईल. सिंचनासाठी ‘प्रती थेंब अधिक पीक’ योजनेत ३ हजार ५५९ आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत २ हजार १५३ लाभार्थींची निवड झाली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत अमरावती जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला असून, ही जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब आहे. अमरावतीत ‘पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क’, विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.औद्योगिक वसाहतीत आयटी पार्क, पायलट प्रशिक्षण केंद्र आकारास येत आहे. रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १ हजार ५५ कर्ज प्रकरणे मंजूर झाली असून, यात ६३३ महिला उद्योजिकांचा समावेश आहे, अशी माहिती पाटील यांनी या वेळी दिली.या वेळी अपर आयुक्त सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, सहायक ग्रंथालय संचालक राजेश पाटील, सहायक ग्रंथालय संचालक सुरजकुमार मडावी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मंगेश पाटील, महसूल सहायक मनीषा ढोके, रितू तळमळे, पवन मुंडे, संजय अंबाडेकर, सुमेधा बारलिंगे, मंजिरी महाजन, संध्या साउरकर, कविता पाचघरे, पोलिस निरीक्षक नीलेश गावंडे, राखीव पोलिस उपनिरीक्षक श्रीधर गुळसुंदरे, पोलिस उपनिरीक्षक योगेश श्रीवास, अजय मिश्रा, प्रवीण काळे, सहायक उपनिरीक्षक विजय पेठे, राजेंद्र शाहाकार, हवालदार राजेश कोचे, राजीव बाहेनकर, दीपक सुंदरकर, शंकर बावनकुळे,पंकज गावंडे, उज्ज्वल सामुद्रे, शिवकुमार तायडे उपस्थित होते. प्रारंभी विविध शासकीय विभागामार्फत परेड संचलन केले. मंत्री पाटील यांनी परेड संचलनाचे निरीक्षण केले. परेडचे संचलन परेड कमांडर उपविभागीय पोलिस अधिकारी सागर भामरे, दुय्यम परेड कमांडर राखीव पोलिस निरीक्षक श्रीधर गुळसुंदरे यांनी केले. सन २०२४-२५ या वर्षासाठी ‘विशेष जिल्हा युवा पुरस्कार’ नाळ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास पोकळे, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केल्याबद्दल युवक गटातून अमर वानखडे (तिवसा), युवती गटातून जानव्ही राऊत (नया वाठोडा) तसेच संस्था गटातून श्री संताजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था (गुरुकुंज आश्रम) यांना सन्मानित करण्यात आले. सन २०२५-२६ या वर्षासाठी युवक गटात समाजप्रबोधनकार वेदांत मुंदाने (अमरावती), युवती गटात पुजा गुंजरकर (ब्राम्हणवाडा थडी), संस्था गटात स्वामी विवेकानंद विचार मंच (अचलपूर) यांना सन्मानित केले.
