महाराष्ट्रात 'शून्य सावली'चा अनुभव सुरू:3 ते 31 मे दरम्यान विविध शहरांमध्ये दिसणार हा खगोलशास्त्रीय चमत्कार

0
1ba815e9-3411-4f03-b8b8-fa67541f62e8_1777794757145.jpg




महाराष्ट्रात यंदाही मे महिन्यात ‘शून्य सावली’चा अनुभव घेता येणार आहे. ३ मे ते ३१ मे दरम्यान राज्यातील विविध शहरांमध्ये काही क्षणांसाठी वस्तूंची सावली पूर्णपणे नाहीशी होईल. हा एक खगोलशास्त्रीय चमत्कार असून, तो नागरिकांना विज्ञानाची प्रत्यक्ष जाणीव करून देतो. ‘शून्य सावली दिवस’ म्हणजे असा क्षण, जेव्हा दुपारी सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर (९० अंशांच्या कोनात) येतो. यामुळे कोणत्याही उभ्या वस्तूची सावली काही मिनिटांसाठी पूर्णपणे नाहीशी होते. पृथ्वीवरील कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यानच्या प्रदेशात वर्षातून दोनदा हा अनुभव येतो – एकदा उत्तरायणात आणि एकदा दक्षिणायनात. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशांनी कललेला असल्यामुळे सूर्याची किरणे वर्षभर उत्तर-दक्षिण दिशेने सरकतात. यामुळे कर्कवृत्त (२३.५° उत्तर) आणि मकरवृत्त (२३.५° दक्षिण) यांच्या दरम्यानच्या भागांमध्ये सूर्य कधी ना कधी थेट डोक्यावर येतो. भारतात, अंदमानमधील इंदिरा पॉइंट येथे एप्रिलमध्ये या घटनेची सुरुवात होते आणि कर्कवृत्ताजवळ त्याचा शेवट होतो. महाराष्ट्रात कोल्हापूर (१५.६° अक्षांश) ते धुळे (२१.९८° अक्षांश) या पट्ट्यात ‘शून्य सावली’चा अनुभव घेता येईल. याची सुरुवात ३ मे रोजी सावंतवाडीपासून झाली. १३ मे रोजी पुणे परिसरात, १५ मे रोजी मुंबई आणि नवी मुंबईत, तर २६ मे रोजी नागपूर आणि भंडारा येथे ही घटना दिसेल. ३१ मे रोजी धुळे जिल्ह्यातील तोरणमाळ येथे याचा शेवट होईल. प्रत्येक शहरासाठी वेळेत काही सेकंदांचा फरक असला तरी, साधारणतः दुपारी १२ ते १२:३५ या वेळेत हे निरीक्षण करता येते. ‘शून्य सावली’चा अनुभव घेण्यासाठी कोणत्याही विशेष साधनांची आवश्यकता नाही. यासाठी एक उभी वस्तू, जसे की काठी, पाईप किंवा स्वतः व्यक्ती, मोकळ्या जागेत किंवा घराच्या छतावर उभी करावी. दुपारी दिलेल्या वेळेत सूर्याचे निरीक्षण केल्यास, सूर्य डोक्यावर आल्यावर सावली पूर्णपणे नाहीशी झाल्याचे दिसेल. हा क्षण काही सेकंदांपासून काही मिनिटांपर्यंत टिकू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed