मंत्री झिरवाळांनी हिंगोलीकरांच्या भावना दुखावल्या:कयाधूचे पाणी इसापूर मार्गे नांदेडला वळवण्याच्या विधानावर वाद होण्याची शक्यता
![]()
कयाधूच्या पाण्यावरून पालकमंत्री झिरवळांच्या वक्तव्याने नवा वाद उभा राहण्याची चिन्हे, हिंगोलीत मुबलक पाणी असेल तर त्यांनी पाणी न्यावे ः पालकमंत्री झिरवाळ हिंगोली जिल्ह्यातील कयाधूच्या पाणी प्रश्नावरर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. “हिंगोली जिल्ह्यातील सिंचनासाठी तसेच पाण्याची तहान भागत असेल तर इतर पाणी त्यांनी पाणी न्यावे,” असे विधान करत त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. यामुळे आधीच संतप्त असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त हिंगोली दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी कयाधूचे पाणी इसापूरकडे वळविण्याच्या प्रश्नावर थेट भूमिका स्पष्ट करण्याऐवजी नागरिकांना उन्हापासून बचाव करण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये नाराजी पसरली. हिंगोलीतील कयाधू नदीवरील खरबी बंधाऱ्यातून बोगद्याद्वारे पाणी इसापूर धरणात वळविण्याचे काम सुरू असून, पुढे हे पाणी नांदेड जिल्ह्याकडे नेले जाणार आहे. या योजनेला हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जोरदार विरोध आहे. स्थानिकांच्या मते, स्वतःच्या जिल्ह्यात पाणीटंचाई असताना इतर जिल्ह्याकडे पाणी वळवणे अन्यायकारक आहे. मात्र त्यानंतरही हिंगोली जिल्ह्याला सिंचनासाठी जेवढे पाणी लागले त्यापेक्षा अधिक पाणी असेल तर त्यांनी घेऊन जावे असे त्यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाबाबतही गोंधळ उडाला. हिंगोलीत असे कार्यालय अस्तित्वात नसतानाही ते कार्यालय असल्याचा दावा पालकमंत्र्यांनी केला. मात्र, ही माहिती चुकीची असल्याचे लक्षात येताच त्यांनी नमते घेत “कार्यालय नसले तरी अधिकारी कार्यरत आहेत” असे स्पष्टीकरण देत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न पालकमंत्री झिरवाळ यांनी केला. हिंगोली जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या गंभीर प्रश्नावर प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. ज्या ठिकाणी उपाय योजना करता येतील त्या ठिकाणी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या जाणार असल्याचे सांगितले. मात्र, पत्रकारांच्या रोखठोक प्रश्नांमुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि अखेर पालकमंत्र्यांना काढता पाय घ्यावा लागला आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीतून नेले जाणारे पाणी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पालकमंत्री झिरवाळांच्या वक्तव्याने नव्याने वाद वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
