जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाची शक्यता:हवामान विभागाचा अंदाज; तापमानात अत्यल्प घट
![]()
प्रतिनिधी | अकोला गत तीन दिवस जिल्ह्यात उष्णतेचा भडका उडाला असतानाच बुधवारी मात्र तापमान तुलनेने कमी नोंदण्यात आले. पारा ४४.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला असून ३ मेपर्यंत मात्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच याच कालावधीत अवकाळी पावसाचीही शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यंदा उन्हाळ्यात तापमान मार्चमध्येच प्रचंड तापले. २ मार्च रोजी तर अकोल्यात भारतात सर्वाधिक ३८.५ सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. त्यानंतर एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात पारा ४६ पार झाला. उन्हाच्या तीव्रतेमुळे हातपाय भाजल्यासारखे जाणवत असून, डोक्याला दुपट्टा बांधूनही उन्हापासून संरक्षण होत नसल्याचे जाणवत होते. उन्हाची तीव्रता दुपारनंतर प्रचंड वाढल्यामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसून आले. दरम्यान बुधवारी हवामान विभागाकडून नवीन अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार ३ मेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत प्रशासनाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहे. वीज, वारा व पावसापासून बचावाकरिता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. ताशी ४० ते ५० किमी प्रतितास राहणार ३ मेपर्यंत हवेचा वेग जिल्ह्यात रविवारी, ३ मेपर्यंत ताशी ४० ते ५० कि.मी. प्रतितास याप्रमाणे हवेचा वेग राहण्याची शक्यता आहे, हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार आवश्यक दक्षता घेण्याबाबत सुचित करण्यात येत आहे. उष्मालाट असल्याने दुपारी १२ ते ४ या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, उन्हात वाहने शक्यतो चालवू नये, ज्वलनशील पदार्थांपासून शक्यतो दूर राहावे. लहान मुले व पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
