बागेश्वर बाबांच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका:दुसरीकडे- उद्धव ठाकरेंच्या भेटीचे वृत्त फेटाळले, म्हणाले- लपून भेटण्याची गरज नाही
![]()
नागपूरमध्ये पार पडलेल्या एका धार्मिक कार्यक्रमानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याशी संबंधित एक प्रसंग सांगितला. या कथनामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना या विषयावर भाष्य केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, इतिहासात अशा प्रकारचा कोणताही ठोस दाखला उपलब्ध नाही. महापुरुषांभोवती अनेक लोककथा तयार होतात, त्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्वरूपात सांगितल्या जातात, असे ते म्हणाले. रामायण आणि महाभारत यांसारख्या ग्रंथांमध्येही विविध लोकपरंपरा आढळतात, त्यामुळे अशा कथांना इतिहास म्हणून स्वीकारताना काळजी घ्यावी लागते, असे त्यांनी सूचित केले. फडणवीस पुढे म्हणाले की, आपण ज्या ऐतिहासिक ग्रंथांचा अभ्यास केला आहे किंवा जे अधिकृत संदर्भ उपलब्ध आहेत, त्यात अशा घटनेचा उल्लेख नाही. त्यामुळे लोककथा आणि इतिहास यातील फरक ओळखणे आवश्यक आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर या वादावर काही प्रमाणात स्पष्टता आली असली, तरी राजकीय वर्तुळात चर्चा अद्याप सुरूच आहे. उद्धव ठाकरेंना लपून-छपून भेटण्याची गरज नाही दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक राजकीय चर्चा रंगली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मध्यरात्री ‘वर्षा’ निवासस्थानी गुप्त भेट झाल्याचा दावा काही माध्यमांकडून करण्यात आला होता. या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. विशेषतः विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय अर्थ लावले जाऊ लागले होते. या संदर्भातही फडणवीस यांनी ठाम भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, जर भेट घ्यायची असेल तर ती उघडपणे घेता येते, लपून-छपून भेटण्याची कोणतीही गरज नाही. आमच्यात असे कोणतेही विषय नाहीत की ते लपवावे लागतील, असे ते म्हणाले. त्यांनी या भेटीच्या चर्चांना पूर्णपणे नकार देत, अशा बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला. राजकीय समीकरणांवरून तर्कवितर्क या कथित भेटीबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही सावध प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, ही भेट झाली की नाही हे संबंधित दोन नेतेच स्पष्ट करू शकतात. त्याचवेळी भाजपकडूनही ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे सांगण्यात आले. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी कोणतीही अशी भेट घडलेली नसल्याचे स्पष्ट केले. या सर्व घडामोडींमुळे राज्यात दोन वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा रंगली आहे, एक म्हणजे शिवाजी महाराजांबाबतचे वादग्रस्त विधान आणि दुसरे म्हणजे कथित राजकीय भेट. एका बाजूला इतिहासाच्या संदर्भांवरून वाद निर्माण झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला राजकीय समीकरणांवरून तर्कवितर्क सुरू आहेत.
