संपाचा तिसरा दिवस; नागरिकांचे हाल:तहसील कार्यालयातून दाखले मिळत नाही- ग्रामस्थ त्रस्त
![]()
जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप तिसऱ्या दिवसाकडे वाटचाल करित आहे. या आंदोलनामुळे तहसील कार्यालयातून प्राप्त होणारे दाखले नागरिकांना मिळणे बंद झाले असून आरोग्यसेवासुद्धा कोलमडली आहे. त्यामुळे नागरिकांना हाल सहन करावे लागत आहे. दरम्यान संपाबद्दल तोडगा काढण्यासाठी आज, बुधवारी मुंबईत मुख्य सचिवांसोबत सुकाणू समितीची बैठक पार पडली. यावेळी १८ मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. परंतु त्यातून कोणताही ठोस उपाय बाहेर आला नाही. त्यामुळे संप उद्या, गुरुवारीही सुरुच राहणार असल्याचे समन्वय समितीचे निमंत्रक तथा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अमरावती शाखेचे सरचिटणीस डी. एस. पवार यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. दरम्यान आज, बुधवारी सकाळी त्यांच्याच नेतृत्वात येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये निदर्शने करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी उद्या, गुरुवारीसुद्धा अशीच एकजूट कायम ठेऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.
