2029 ला काय चित्र असणार हे आत्ता सांगणे अवघड:श्रीनिवास पवारांची प्रतिक्रिया; पवार कुटुंबातील फूटीवरही मांडले परखड मत
![]()
दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आणि आज त्यासाठीचे मतदान पार पडत आहे. अजित पवारांच्या जागी त्यांच्या पत्नी व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उभ्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून देखील त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. या संपूर्ण निवडणुकीवर श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रीनिवास पवार म्हणाले, बारामतीकर हुशार आहेत, त्यांनी मोठे मोठे नेते बघितले आहेत राजकारणात, पिढ्यानपिढ्या बघत आले आहेत. त्यामुळे तेच ठरवतील आणि काळच सांगेल काय होणार काय नाही. तसेच युगेंद्र पवारांनी 2029 च्या निवडणुकीत उभे राहण्याचे ठरवले आहे, यावर बोलताना ते म्हणाले, ज्यांचे ज्यांचे कार्यकर्ते असतात त्या प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटत असते की आपल्या नेत्याने पुढे जावे. 2029 साली काय चित्र असणार हे आत्ताच सांगणे अवघड पुढे बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, 2029 साली काय चित्र असणार हे आत्ताच सांगणे अवघड आहे. 27 जानेवारीपर्यंत आपल्याला माहीत नव्हते की अजितदादांचे असे अचानक जाणे होईल. तसेच हे आहे की तेव्हा काय होईल 3 वर्षांत, सगळे पक्ष वेगळे लढतील का, की पक्षांमध्ये युती होईल, किंवा हे दोघे एक होतील का, हे सगळे प्रश्न आहेत. तसेच एक झाले तर काय आणि नाही झाले तर काय.. आणि सुनेत्रा वहिनींना पण आता 2-3 च महीने झाले आहेत, त्यांनाही वेळ लागेल सेटल व्हायला. सेटल झाल्यावर त्यांचेही मतं बदलतील किंवा ठाम होतील, काहीही होऊ शकते. भाजपला बदनाम करून काय होणार आहे? तसेच भाजपवर आरोप होताना दिसत आहेत की त्यांनी पवार घरण्यात फूट पाडून राजकारण केले, यावर प्रश्न विचारला असता श्रीनिवास पवार म्हणाले, भाजपला बदनाम करून काय होणार आहे? तुम्हाला जर तुमच्या स्वतःचे कळत नाहीये, पवार कुटुंब एवढे जुने आहे राजकारणात तर तुम्हाला ते कळले पाहिजे, असेही स्पष्ट मत श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केले आहे. अजितदादा दादा होता शेवटी श्रीनिवास पवार अजितदादांच्या विषयी तसेच पक्षाबद्दल बोलताना म्हणाले, मला असे वाटते परिस्थिती बदलली. दादा दादा होता शेवटी, तो पार्टी कंट्रोल करू शकत होता, आता दादानंतर मुले लहान आहेत, वहिनी नवीन आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षातील जे काही बाकीचे सीनियर लीडर आहेत, ते काही मध्ये बोलत असतील. करायचे, नाही करायचे. तेव्हा निर्णय घेणारे दादा होते, दादा एकटे निर्णय घेणारे होते, तो फक्त पार्टीचा विचार घ्यायचा, त्यांनी एकदा ठरवले की ठरवले, आता सगळ्यांच्या विचाराने सुरू आहे, अजून दादाला जाऊन पण तीन महिने झालेले नाहीत. त्यांच्या पक्षातील एकदा सेटल झाले, सगळ्या गोष्टींमधून हा सगळा मोठा धक्का आहे, कुटुंब म्हणून इतकी उलथा पालथ झालेली, की पार्थ खासदार झाला, वहिनी आता आमदार होतील, उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे हे सगळे समजायला वेळ जाईल. मग एखाद्या वेळेस त्यांचे विचार परत दादांसारखे होतील, नाही होतील, ते आता काळच ठरवेल.
