'मराठा-कुणबी' स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा:मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त खरा, मनोज जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
![]()
मराठा समाजाच्या प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी आणि समाजाच्या सुख-दुःखाकडे पूर्णवेळ लक्ष देण्यासाठी राज्यात स्वतंत्र ‘मराठा आणि कुणबी’ मंत्रालय स्थापन करावे, अशी आग्रही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. धाराशिव येथे भीम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मराठा आरक्षण उपसमितीच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवताना जरांगे पाटील म्हणाले की, “मराठा समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष देणे हे उपसमितीचे काम आहे, मात्र ही समिती नेमके काय करते, हेच कळायला मार्ग नाही. सातारा गॅझेटचा अहवाल येऊन आठ महिने उलटले, तरी अद्याप त्यावर निर्णय का घेतला नाही? आणखी किती दिवस आम्ही वाट पाहायची?” उपसमिती समाजाचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरली असून ती तात्काळ बरखास्त करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ‘विदूषकां’साठी वेळ असलेल्या मंत्र्यांकडे समाजासाठी वेळ नाही महसूल मंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील यांची जीभ चांगलीच घसरली. ते म्हणाले, “मराठवाड्यात मराठा समाजाची एक बैठक लावण्यासाठी विखे पाटलांकडे वेळ नाही. मात्र, उपद्रवी विदूषक लोकांसाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे. विखे पाटलांनी उपसमितीच्या अध्यक्षपदावरून स्वत:चे नाव घालवले आहे.” विखे पाटलांनी समाजाचा विश्वास गमावल्याचा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला. कष्ट करा, आळस सोडा; तरुणांना सल्ला आरक्षणासोबतच जरांगे पाटील यांनी समाजातील तरुणांच्या लग्नाळू प्रश्नांवर आणि शेतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न व्हायची असतील तर शेतीतून उत्पन्न निघण्याची गरज आहे. त्यासाठी पाणी गरजेचे आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी मरत आहेत. पोरांनींही कष्ट करण्याची गरज आहे, उद्योगधंद्याकडे वळायला हवे. घरात खायला नाही तर कोण पोरगी देणार तुम्ही कष्ट करा, उद्योग धंद्याकडे वळा. आळशी पणा सोडला पाहिजे कष्ट करायला हवे शेतीतून खूप पैसा आहे. काम करायचे नसेल तर लग्नाचे काय सांगू असे म्हणत जरांगे पाटलांनी लग्नाळू तरुणांना सल्ला दिला.
