संभाजीनगरमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात मनपाची मोठी कारवाई:5 हजार 170 किलो प्लास्टिक जप्त, 75 हजार रुपयांचा दंड

0
1d914c9c-fe5d-42c3-abcd-b6312d6ee231_1776869490017.jpg




छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात मोठी कारवाई केली आहे. मध्यवर्ती भागात केलेल्या या धडक मोहिमेत ५१७० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, संबंधित विक्रेत्यांकडून ₹७५,००० दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई झोन क्र. २ अंतर्गत अंगुरी बाग आणि जुना मोंढा परिसरातील ३ ते ४ दुकानांची तपासणी करून करण्यात आली. यामध्ये शालिमार प्लास्टिक, संजय प्लास्टिक, एनबी प्लास्टिकसह इतर स्थानिक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान, या विक्रेत्यांच्या शहरातील विविध दुकाने, गोदामे आणि ट्रान्सपोर्ट कंपन्यांवरही छापे टाकून प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जप्त केलेले प्लास्टिक हर्सूल कचरा प्रक्रिया केंद्रावर श्रेडिंग करून तात्काळ विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेकडून प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात सातत्याने जनजागृती केली जात असून, नागरी मित्र पथकाद्वारे नियमित कारवाई सुरू आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकची वाहतूक आणि विक्री होत असल्याने ही विशेष मोहीम राबवण्यात आली. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त रमेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरी मित्र पथकाने ही कारवाई केली. या पथकात देविदास सुसर, बालाजी साबळे, सुवर्णसिंग परदेशी, जनार्दन सांगळे, संतोष बनकर, किशन निकम, ज्ञानेश्वर पाटील, रतन वाघ, नारायण फुके, जयेश मगरे यांचा समावेश होता. यावेळी स्वच्छता अधिकारी अनिल जाधव, स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ, अभिजित गंगावणे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. महापौर समीर राजूरकर यांनी सांगितले की, शहरात प्लास्टिकचा सर्रास वापर खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून महानगरपालिकेला सहकार्य करावे आणि पर्यायी साधनांचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले. आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले की, यापुढेही शहरात प्रतिबंधित प्लास्टिकची विक्री किंवा वापर आढळल्यास कठोर कारवाई करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. दरम्यान, नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत प्लास्टिक बंदीवर सविस्तर चर्चा झाली होती. महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, सभागृह नेते गोविंद केंद्रे, विरोधी पक्षनेते समीर सय्यद यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांनी शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी एकमताने भूमिका घेत प्रशासनाला कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed