गिरीश महाजनांनी तेवढा तरी अजितदादांचा आदर्श घ्यावा:व्हायरल व्हिडिओवरून अमोल मिटकरींचा सल्ला; मुरलीधर मोहोळ यांच्यावरही निशाणा
![]()
वरळी येथे भाजपतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे सर्वसामान्य महिलेने संताप व्यक्त करत थेट मंत्री गिरीश महाजन यांना ‘गेट आऊट’ म्हटले. या महिलेचा हा रुद्रावतार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यावर गिरीश महाजन यांनी त्यांची भाषा योग्य नव्हती असे म्हटले आहे. आता यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांचे उदाहरण देत महाजन यांना सल्ला दिला आहे. अमोल मिटकरी म्हणाले, एक सर्वसामान्य महिला मंत्र्यांवर चिडली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. 16 हजार ट्विट त्या व्हिडिओचे झाले आहेत. इथे अजित पवार आपल्याला लक्षात घ्यायला हवेत. पत्रकार त्यांना विचारायचे पहाटे कामाला सुरुवात का करतात, तर दादा सांगायचे यामुळे लोकांना ट्रॅफिक समस्या जाणवत नाही. आपल्यामुळे त्यांना त्रास होत नाही आणि कामे देखील लवकर होतात. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी लवकर पोहोचता येते. गिरीश महाजन यांनी तेवढा तरी अजित पवारांचा आदर्श घ्यावा, असा सल्ला मिटकरी यांनी दिला आहे. मुरलीधर मोहोळ यांना सवाल यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या अपघात प्रकरणी मुरलीधर मोहोळ यांना काही प्रश्न विचारले आहे. ते म्हणाले, माझा मुरलीधर मोहोळ यांना प्रश्न आहे की, अजित पवार यांचे विमानात बसण्यापूर्वीचे सीसीटीव्ही अद्याप बाहेर का आले नाहीत? तुम्ही म्हणाला 15 दिवसांत ब्लॅक बॉक्स डेटा बाहेर आणू, मग 4 महीने झाले, का हा डेटा बाहेर आला नाही? त्यांनी टाइमबॉन्ड पाळला नाही, त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. तसेच अशोक खरातचे सीसीटीव्ही गतीने बाहेर येतात, परतवाडा प्रकरणातील सीसीटीव्ही बाहेर येतात, मग अजित पवार यांचे अपघाताचे का नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नाशिकसारखीच अजितदादांच्या प्रकरणात गती यावी पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, बारामती विमान दुर्घटनेचा ब्लॅकबॉक्स अद्याप बारामती पोलिस ठाण्यात आहे. बारामतीत मी मागील 3 दिवस फिरत आहे. बारामतीचे लोक आम्हाला सांगत आहेत की, अजित पवार विमान दुर्घटनाप्रकरणी तपासाबाबत आमची नाराजी आहे. नाशिक, परतवाडा प्रकरणांसारखी या प्रकरणाला गती आली तर नक्कीच आम्हाला बरे वाटेल. दादांचे दुर्दैव म्हणायचे का? महाराष्ट्रात एफआयआर होत नाही याची खंत असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. ते म्हणाले, बेंगलोरमध्ये एफआयआर दाखल झाला, तर सरकारने परत पाठवला, त्यांचे म्हणणे आहे की कागदांची पूर्तता झाली नाही. हे दादांचे दुर्दैव म्हणायचे का? अद्याप हे सांगत नाही साहिल मदान कुठे आहे? तो कपूर कुठे आहे? जीवंत आहेत की मेले, हे तरी आम्हाला सांगा, अशी मागणीही मिटकरी यांनी केली आहे.
