सुनेत्रा पवारांमध्ये मोठं नेतृत्व दडलेलं; देवेंद्र फडणवीसांचा ठाम दावा:म्हणाले – 35 वर्षे राजकारणात, नेत्याची क्षमता ओळखण्याचा अनुभव

0
730-x-548-new-2026-04-22t095617326_1776832182.jpg




बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सांगता सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबत मोठं विधान करत राजकीय वातावरण तापवलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीत सुनेत्रा पवार सक्षमपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या सभेत बोलताना फडणवीस यांनी सुनेत्रा पवार केवळ उपमुख्यमंत्रीपदासाठी योग्य नाहीत, तर राज्याला सक्षम नेतृत्व देण्याची ताकद त्यांच्यात असल्याचा विश्वास व्यक्त केला. फडणवीस यांनी आपल्या अनुभवाचा उल्लेख करत सांगितले की, ते गेली 35 वर्षे राजकारणात सक्रिय आहेत आणि त्यामुळे एखाद्या नेत्याची क्षमता ओळखण्याचा त्यांना पुरेसा अनुभव आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या कामकाजाचा जवळून अभ्यास केला असून, त्या दीर्घकालीन राजकारणात यशस्वी होऊ शकतात, असा त्यांचा ठाम निष्कर्ष आहे. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला एक सक्षम आणि पुढे जाणारे नेतृत्व मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी स्वीकारली असून त्या कर्तव्यभावनेतून काम करत असल्याचे फडणवीस म्हणाले. खासदार झाल्यानंतर त्यांनी राजकीय जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे सांभाळल्या आहेत. याशिवाय सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अजित पवारांसोबत काम केल्यामुळे त्यांना प्रशासन आणि राजकारणाची चांगली जाण आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे बारामतीसह राज्याच्या विकासासाठी त्या सक्षमपणे काम करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभेत अजित पवार यांच्या विमान अपघाताचाही उल्लेख करत फडणवीस यांनी भावनिक सूर लावला. या अपघाताबाबत अनेकांच्या मनात शंका असून, त्यामागील सत्य समोर येईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा शब्द त्यांनी बारामतीकरांना दिला. या घटनेची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर यावे, अशी जनतेचीही अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले. या सांगता सभेला त्यांनी स्मृती यज्ञ, असे संबोधले. अजित पवार यांच्या आठवणी जपण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी ही सभा महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. बारामतीतील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. जर या यज्ञात आपली आहुती दिली नाही, तर ती मोठी चूक ठरेल, अशा शब्दांत त्यांनी मतदारांना मतदानासाठी प्रेरित केले. किती मोठे मताधिक्य मिळते याकडे सर्वांचे लक्ष एकूणच, बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत फडणवीस यांनी जोरदार प्रचार केला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे या निवडणुकीला अधिकच रंग चढला असून, सुनेत्रा पवार यांना किती मोठे मताधिक्य मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीतील राजकीय समीकरणे आणखी वेगाने बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks