विद्यार्थ्यांनो समाजिक कार्य करून समाजाचे ऋण फेडा -अॅड. संजय तिकांडे:सामाजिक कार्यावर सीताबाई महाविद्यालयात पार पडली कार्यशाळा
![]()
प्रतिनिधी | अकोला सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभाग आणि ऊर्जापर्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या सामंजस्य करार कार्यक्रमांतर्गत पदव्युत्तर इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. समाजसेवा ही केवळ कर्तव्य नसून समाजाचे ऋण फेडण्याची एक संधी असल्याचे अॅड. संजय तिकांडे पाटील म्हणाले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऊर्जापर्व फाउंडेशनचे संचालक अॅड. संजय तिकांडे पाटील होते. अध्यक्षस्थानी इतिहास विभाग प्रमुख डॉ. संतोष कुलकर्णी होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अॅड. तिकांडे यांनी विविध सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. समाजसेवा ही केवळ कर्तव्य नसून समाजाचे ऋण फेडण्याची एक संधी असल्याचे त्यांनी सांगितले. उपक्रमांमध्ये आदिवासी बांधवांना हिवाळ्यात उबदार कपड्यांचे वाटप, दिवाळीनिमित्त किल्ले बांधणी स्पर्धा, महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक प्रा. रोशन वानखडे यांनी केले. प्रा. राकेश मुदिराज यांनी गुरुऋण, पितृऋण आणि समाजऋण यांचा उल्लेख केला. समाजऋण हे सर्वांत श्रेष्ठ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प्रत्येक व्यक्ती समाजाचे काही ना काही देणे लागतो. ते फेडणे जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. जबाबदारी ओळखणे गरजेचे डॉ. संतोष कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देत मार्गदर्शन केले. शिक्षणासोबतच समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून प्रत्येक घटकांपर्यंत मदतकार्य पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी आवाहन केले. सामाजिक जाणीव, सहकार्याची भावना आणि सेवाभाव अंगीकारल्यासच समाजाचा सर्वांगीण विकास साधता येतो, असे त्यांनी सांगितले.
