एकनाथ शिंदेंना आव्हान देणारे 'मातीमोल' झाले:उदय सामंत यांचा विरोधकांना इशारा; शिंदेंनी शून्यातू विश्व निर्माण केल्याचा दावा
![]()
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील सभेपूर्वी शिवसेनेतील अंतर्गत नाराजी आणि राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. “एकनाथ शिंदे यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. त्यांना आव्हान देणारे कसे मातीमोल झाले, हे सर्वांना माहीत आहे,” असे सामंत म्हणाले. पुणे दौऱ्यावर असलेल्या उदय सामंत यांनी सोमवारी कोथरूड आणि शिवाजीनगर मतदारसंघातील पक्ष संघटनेची बैठक घेतली. साताऱ्याचे आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीबाबत विचारले असता, सामंत म्हणाले की, “साताऱ्यात आमचे ज्येष्ठ मंत्री शंभूराज देसाई सक्षमपणे काम पाहत आहेत. तिथे कोणालाही डावलून काम होत नाही.” ते पुढे म्हणाले, “साताऱ्यात शिवसेनेचे साम्राज्य मोठे असून आजची गांधी मैदानावरील सभा विक्रमी होईल. ज्यांना साहेबांनी मोठे केले, त्यांनी किमान त्यांना आव्हान देऊ नये,” असे त्यांनी नाव न घेता सुनावले. पुणे दौऱ्यादरम्यान सामंत यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर भर दिला. पुणे शहर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांत शिवसेनेचे काम वेगाने सुरू आहे. पुढच्या आठवड्यात विधानसभा निहाय स्वतंत्र बैठका घेतल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली. या बैठकांमध्ये पक्षाची भविष्यातील शिस्त आणि रचना कशी असावी, यावर चर्चा करण्यात आली. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवर बोलताना सामंत म्हणाले की, नाशिक आणि अमरावतीमधील घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलत आहे. आयटी कंपन्यांमध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी योग्य खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले. विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. युतीच्या वाट्याला येणाऱ्या सर्व जागा निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारामती लोकसभा पोटनिवडणुकीवर भाष्य करताना सामंत यांनी सांगितले की, सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उद्यापासून दोन दिवस बारामतीत तळ ठोकणार आहेत. सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा दावाही उदय सामंत यांनी केला.
