अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी सुरु:20 जूनपर्यंत मुदत, 22 ते 25 दरम्यान प्रत्यक्ष प्रवेश




अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी गुरुवार, १८ जूनपासून अमरावतीत सुरू झाली आहे. ही प्रक्रिया २० जूनपर्यंत चालणार आहे. यावर्षी अकरावीच्या सर्व शाखांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने केले जात आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयात प्रवेश घेता येणार नाही. या टप्प्यात नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे, तसेच नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना भाग-१ आणि भाग-२ मध्ये बदल करण्याची संधी मिळेल. भाग-१ वैयक्तिक व शैक्षणिक माहितीशी संबंधित आहे, तर भाग-२ मध्ये महाविद्यालयांचा पसंतीक्रम दर्शवावा लागतो. यात किमान एक आणि जास्तीत जास्त दहा महाविद्यालयांची नावे समाविष्ट करता येतील. ही प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी २२ जून रोजी सकाळी १० वाजता पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. या यादीत कट ऑफ आणि महाविद्यालयांचे वाटप यांचा समावेश असेल. यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील तीन दिवसांत, म्हणजेच २५ जूनच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागेल. तिसऱ्या फेरीचे प्रवेश २५ जून रोजी पूर्ण झाल्यानंतर, २७ जून रोजी कोणत्या महाविद्यालयात कोणत्या माध्यमाच्या किती जागा भरल्या गेल्या आणि किती जागा शिल्लक आहेत, याची आकडेवारी पोर्टलवर जाहीर केली जाईल. त्यानंतर चौथी फेरी सुरू होणार असून, त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *