वसमतच्या तहसीलदाराचे निलंबन अन्यायकारक:कारवाई द्वेषभावनेतून झाल्याचा आरोप, नागरिकांची निलंबन मागे घेण्याची मागणी
![]()
गौण खनिज उत्खनन अन् वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपातून निलंबित केलेल्या तहसीलदार शारदा दळवी यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वात जास्त १५५ वाहने पकडण्यात आली. तसेच २.९१ कोटींचा दंडही आकारण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर झालेली कारवाई द्वेषभावनेतून झाल्याचा आरोप केला जात आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत अवैध गौणखनीज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. यामध्ये महसूल विभागाने तालुकास्तरावर तसेच पोलिस विभागानेही स्वतंत्र पथके स्थापन करून कारवाईची सपाटा सुरु केला आहे. त्यामुळे वाळू तस्करांना लगाम बसला आहे. दरम्यान, वसमत तालुक्यात तहसीलदार शारदा दळवी यांनी मागील अडीच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वात जास्त वाहनांवर कारवाई केली आहे. त्यांच्या कालावधीत वसमत तालुक्यातील तब्बल १५५ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर २.९१ कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. याशिवाय गुन्हेही दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी नांदेडहून येणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त कारवाई वसमत तालुक्यात असतानाही तहसीलदार दळवी यांच्यावर गौण खनीज उत्खननाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून त्यांना निलंबीत केले आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त कारवाई असतानाही त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे ही कारवाई द्वेषभावनेतून झाल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे. या प्रकारामुळे अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचा दावाही केला जात आहे. दरम्यान, या संदर्भात दीपक कदम,अलोक इंगोले, करण जाधव, अंकुश कोरडे यांच्यासह नागरीकांनी शासनाकडे पत्र पाठविले असून तहसीलदार दळवी यांच्यावर झालेली कारवाई चुकीच्या पध्दतीने झाली आहे. त्यांनी कठोर निर्णय घेतल्यामुळे काही जण दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावरील निलंबन रद्द करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
