मंत्रालयातून यात्रेचा परवाना काढून देण्यासाठी सहा लाख रुपयांची फसवणूक:पाच जणांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
![]()
यात्रेसाठी भाविक नेण्याचा मंत्रालयातून परवाना काढून देण्यासाठी सहा लाख रुपये घेऊन फसवणूक केली तसेच पैसे परत मागितल्यानंतर मारहाण करणाऱ्या पाच जणांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला असून त्यासाठी पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला येथील टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचे सोईल अहमद खान यांच्या मार्फत माजीद पाशा (रा. वसमत) व शेख अतीखुर रहेमान, शेख रिजवान (रा. अर्धापूर) हे भाविकांना यात्रेसाठी पाठवित होते. मात्र सोईल यांच्याकडे भाविक यात्रेसाठी पाठविण्याचा परवाना नसल्याने ते इतरांच्या माध्यमाातून भाविकांना यात्रेसाठी पाठवित होते. मागील दोन ते तीन वर्षापासून त्यांचे व्यवहार सुरु होते. दरम्यान, यात्रेसाठी भाविकांना पाठविण्याचा मंत्रालयातून परवाना काढून देतो असे सांगत वरील तिघांनी सोईल खान यांच्याकडून सन 2024 मध्ये 6 लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी काही कागदपत्रे घेतली. आत मंत्रालयातून परवाना मिळाल्यानंतर आपल्याच टूर्स कंपनीकडून भाविकांना याात्रेसाठी पाठविता येईल अशी सोईल खान यांनी अपेक्षा होती. मात्र सहा लाख रुपये घेतल्यानंतर त्यांनी काहीही केले नाही. याप्रकारामुळे सोईल खान यांनी पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र तिघेही रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागले होते. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पैशाचा तगादा लावण्यास सुरवात केली. मात्र यावेळी शेख माजीद याने आणखी काही भाविकांना यात्रेसाठी पाठवायचे आहे असे सांगत सोईल खान यांना ता. 14 एप्रिल रोजी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना एका वाहनामध्ये बसवून अर्धापूरकडे नेले. त्या ठिकाणी पाच जणांनी मिळून त्यांना मारहाण करून त्यांच्या मोबाईल मध्ये असलेला डाटा डिलीट केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या सोईलखान यांनी सदर प्रकार त्यांच्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी थेट वसमत शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी सोईल खान यांच्या तक्रारीवरून माजीद पाशा, शेख अतीखुर रहेमान, शेख रिजवान व अन्य दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले पुढील तपास करीत आहेत.
