कोणाची तरी 'वाट' लावण्यासाठीच खरात प्रकरण बाहेर काढले:शेतकऱ्याला नाही, पण खरातला पाणी मिळतंय – राज ठाकरे
![]()
नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच आपली परखड प्रतिक्रिया दिली आहे. “हे प्रकरण म्हणजे कोणाची तरी वाट लावण्यासाठी जाणीवपूर्वक बाहेर काढलेली खेळी आहे,” असे सांगतानाच त्यांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर आणि ‘विकल्या गेलेल्या’ यंत्रणेवरही जोरदार प्रहार केला. एका व्यंगचित्राच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत राजकीय नेते, पत्रकार आणि उद्योजकांचा समाचार घेतला. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या राज्यात संतापाची लाट उसळली आहे. खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. अशोक खरात प्रकरणावरून विरोधक राज्य सरकारला धारेवर धरत असताना राज ठाकरे यांनी याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले. ते म्हणाले, “कोणतरी आला हा खरात… शेताला पाणी मिळत नाही, पण खरातला मात्र पाणी मिळतंय! अशी प्रकरणं ही कोणाची तरी ‘वाट’ लावायची म्हणून योग्य वेळी बाहेर काढली जातात. सध्या जे काही सुरू आहे, त्यातून लोक सुधारतील अशी अपेक्षा आहे, जेणेकरून मला पुन्हा व्यंगचित्र काढण्याची संधी मिळेल.” पत्रकारितेचे वास्तव आजच्या पत्रकारितेवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी अत्यंत खेद व्यक्त केला. ते म्हणाले, “मला आजच्या तरुण पत्रकार मुला-मुलींची कीव येते. ऑफिस त्यांना ‘काहीतरी घेऊन या’ सांगतं. आता काय घेऊन यावं? कोणाचे तरी कपडे फाडल्याशिवाय बातमी होत नाही. आजच्या पत्रकारितेचे अनेक पदर आहेत, ते उघडले तर सगळे ‘नागडे’ होतील. अनेक पत्रकार आता मंत्र्यांकडे कामाला आहेत. जे स्वतः विकले गेले आहेत, त्यांच्या मतांना काय किंमत द्यायची?” राज ठाकरेंनी स्वत:चे वृत्तपत्र का काढले नाही? स्वतःचे वृत्तपत्र का काढले नाही, यावर मिश्कील टिप्पणी करताना राज ठाकरे म्हणाले, “माझी वृत्तपत्र काढण्याची इच्छा होती, पण बरं झालं काढलं नाही. कारण आजची वृत्तपत्रे जाहिरातींवर चालतात आणि त्यासाठी जे करावे लागते, ते मला जमले नसते. मी तर ‘मेलेला कोंबडा’ आहे, ज्याला आता आगीची भीती नाही.” पी. के. अत्रेंची आठवण आणि उद्योजकांना टोला आचार्य अत्रेंच्या पत्रकारितेचा गौरव करताना राज ठाकरे यांनी त्यांची तुलना रावणाशी केली. “रावणाची १० तोंडे म्हणजे त्याच्या विद्वत्तेचे प्रतीक होते, अत्रे सुद्धा तसेच विद्वान होते. आजच्या काळात अत्रेंसारखी पत्रकारिता शक्य नाही,” असे ते म्हणाले. तसेच, “आम्हाला महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप होणारे गुजराती हवेत, या जमिनीवर डोळा ठेवणारे नकोत,” असे म्हणत त्यांनी नाव न घेता काही बड्या उद्योजकांनाही लक्ष्य केले.
