जागतिक आरोग्य दिन:30 % लोक लठ्ठपणाचे शिकार, महिन्याला 2 हजार जणांची अँजिओप्लास्टी, वर्षाकाठी 25 हजारांहून अधिक अँजिओप्लास्टीच्या शस्त्रक्रिया
![]()
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने शहराच्या आरोग्याबाबत समोर आलेली आकडेवारी धक्कादायक असली तरी ती प्रत्येकासाठी वेळीच सावध करणारी आहे. बदललेली जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे शहरामध्ये हृदयविकाराचा विळखा घट्ट होत आहे. शहरात महिन्याकाठी तब्बल २ हजार, तर वर्षाकाठी २५ हजारांहून अधिक अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे, पूर्वी उतारवयात दिसणारे हे आजार आता वयाच्या तिशीपासूनच तरुणांना ग्रासत आहेत. काय सांगते छत्रपती संभाजीनगरची आकडेवारी? स्थूलता
शहरातील सुमारे 30 टक्के लोक वाढलेल्या पोटाच्या घेरामुळे म्हणजेच ‘ओबेसिटी’चे शिकार आहेत. उच्च रक्तदाब
35 टक्क्यांहून अधिक लोक हायपरटेन्शनने ग्रस्त आहेत. तिशीतील तरुणांमध्ये याचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. प्री-डायबेटिक
मधुमेह होऊ नये यासाठी काळजी घेतल्यास ते सावरू शकतात. मधुमेह
15 टक्क्यांहून अधिक नागरिकांना मधुमेहाने ग्रासले आहे. कर्करोग रुग्णालयात 42 हजार रुग्ण शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ओपीडीमध्ये 2025 या एकाच वर्षात 42,937 रुग्णांनी उपचार घेतले. विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत 13,068 ने मोठी वाढ झाली आहे. ऑन्कोसर्जन डॉ. राजेश सावजी यांच्या मते, महिलांमध्ये स्तनाचा व गर्भाशयाचा, तर पुरुषांमध्ये फुप्फुस व अन्ननलिकेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. आरोग्याची पंचसूत्री नियमित हालचाल: दररोज किमान 45 मिनिटे वेगाने चालण्याचा व्यायाम करा. आहारावर नियंत्रण: मैद्याचे पदार्थ, अति तेलकट आणि साखरेचा वापर कटाक्षाने टाळा. व्यसनमुक्ती: धूम्रपान, मद्यपान आणि गुटख्यापासून पूर्णपणे लांब राहा. वेळोवेळी तपासणी: तिशीनंतर नियमितपणे बीपी आणि शुगरची तपासणी करा. सकस भोजन: आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि कडधान्यांचा समावेश करा. घाबरू नका, जीवनशैली बदला फास्ट फूड सेवनामुळे शरीरात कार्बोदकांचे प्रमाण वाढून स्थूलता येते, ज्यातून मधुमेह, बीपी आणि किडनीचे आजार बळावतात. नियमित 45 मिनिटे चालणे आणि सकस आहार घेतल्यास या गंभीर आजारांना आपण दूर ठेवू शकतो. -डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, (घाटी) शहरात वर्षाला 25 हजार हृदयशस्त्रक्रिया चाळीशी ओलांडलेल्या 30 ते 35 टक्के लोकांना बीपीचा त्रास होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, उच्च रक्तदाब सुरू होण्याचे प्रमाण आता वयाच्या तिशीमध्येही दिसून येत आहे. व्यायामाकडे नागरिकांचे होत असलेले दुर्लक्ष याला प्रामुख्याने कारणीभूत आहे. परिणामी, हृदयविकाराचा धोका वाढला असून छत्रपती संभाजीनगरात महिन्याकाठी तब्बल दोन हजार, तर वर्षाकाठी २५ हजारांपेक्षा अधिक अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी होत आहेत.
– डॉ. विलास मगरकर, हृदयरोगतज्ज्ञ महिलांमध्ये स्तनाचा, पुरुषांत फुप्फुसाचा कॅन्सर पूर्वी कॅन्सरचे प्रमाण तुलनेने कमी होते. मात्र, गेल्या दहा वर्षांत रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे पाहायला मिळते. शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात 2025 या एकाच वर्षात तब्बल 42 हजार 937 रुग्णांनी उपचार घेतले. विशेष म्हणजे, त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत तब्बल 13 हजार 68 ने वाढ झाली आहे. कॅन्सरचे प्रमाण साधारण दहा टक्क्यांनी वाढत आहे. महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, तर पुरुषांमध्ये फुप्फुस, आतडे आणि अन्ननलिकेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. यालाही बदलती जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव कारणीभूत असून, धूम्रपान, गुटखा आणि मद्यपान कटाक्षाने टाळावे.
– डॉ. राजेश सावजी, ऑन्कोसर्जन आठवड्याला किमान 150 मिनिटे व्यायाम मधुमेहाचा परिणाम केवळ रक्तातील साखरेपुरता मर्यादित नसून हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि मज्जासंस्था यांवर गंभीर परिणाम करतो. यामुळे हृदयरोग, किडनी फेल्युअर, अंधत्व आणि पाय कापण्याची वेळ येण्याचा धोका वाढतो. तसेच आरोग्यखर्चही मोठ्या प्रमाणात वाढतो. उपाय म्हणून संतुलित आहार, नियमित व्यायाम (आठवड्याला किमान 150 मिनिटे), वजन नियंत्रण आणि तणाव व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. नियमित ब्लडशुगर तपासणी, HbA1c मॉनिटरिंग आणि जोखमीच्या व्यक्तींचे लवकर स्क्रीनिंग करणे गरजेचे आहे. समाजपातळीवर जनजागृती, प्रतिबंधक आरोग्य कार्यक्रम आणि प्राथमिक स्तरावर डायबेटीस व्यवस्थापन मजबूत करणे हा दीर्घकालीन उपाय आहे.
– अजय रोटे, मधुमेह तज्ज्ञ वैद्यकीय अभ्यासक
