पुण्यातील गणेशोत्सवाचा उत्साह पाहून मन भरले: मंत्री आशिष शेलार:मानाचे गणपती आणि भाऊसाहेब रंगारी मंडळाला भेट; नाना पटोले, संजय राऊत यांच्यावर टीका

[ads1]


सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी पुण्यातील गणेशोत्सवाचे कौतुक केले. पुण्यातील गणेशोत्सवाची परंपरा आणि उत्साह पाहून मन भरून आले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे. या उत्सवानिमित्त देश-विदेशात विविध कार्यक्रम होत आहेत, असेही शेलार म्हणाले. मानाचे गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर मंत्री शेलार यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाला भेट दिली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे विश्वस्त पुनीत बालन, दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे, रमेश परदेशी आणि नगरसेवक रवींद्र साळगावकर उपस्थित होते. शेलार म्हणाले, गणपती विघ्नहर्ता आहे. तो सर्व विघ्ने दूर करतो. त्यामुळे बाप्पाकडे आणखी काय मागायचे? काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या सरकारवरील टीकेवर शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, प्रश्न विचारणे स्वाभाविक आहे. सरकारच्या काही चुका असतील तर त्यावर टीका झाली पाहिजे. पण, विरोधक जर निसर्गावरच आसूड ओढत असतील, तर त्यांच्या आरोपांत तथ्य नाही. सरकार शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती सर्व कामे करत आहे. विरोधकांकडे काही सूचना असतील तर त्यांनी त्या मांडाव्यात. संजय राऊत यांच्या टीकेवर शेलार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “विपर्यास, बालबुद्धी आणि अविकसित मेंदूचा परिणाम म्हणजे संजय राऊत.” डीजे मुक्त गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणालाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीने उत्सव साजरे केले पाहिजेत, असे शेलार यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाबाबतही त्यांनी माहिती दिली. हा आशीर्वाद घेण्याचा नव्हे, तर सेवा करण्याचा उपक्रम असल्याचे ते म्हणाले. यूपीआय व्यवहारांवरील कराबाबत बोलताना शेलार यांनी स्पष्ट केले की, दोन हजार रुपयांपर्यंत कोणतेही शुल्क नाही. शुल्काची व्यवस्था व्यापाऱ्यांशी संबंधित आहे. ग्राहक किंवा नागरिकांवर त्याचा भार नाही. तृणमूल काँग्रेसच्या पक्षचिन्हाबाबत राहुल गांधींनी बोलण्यापूर्वी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह कसे बदलले, याचे उत्तर द्यावे, असेही शेलार म्हणाले. “छत्रोंकी गुंज”बाबत त्यांनी टीका केली की, हा कार्यालयातील आखाडा आहे. जनतेच्या आखाड्यात त्यांना किंमत नाही. पुनीत बालन यांच्या भूमिकेबाबत शेलार म्हणाले, सहमतीने झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. बालन यांची भूमिका स्वागतार्ह आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *