![]()
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित मराठी बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी अमरावती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सुरू आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सहा दर्जेदार बालनाट्यांचे सादरीकरण झाले, ज्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या सादरीकरणाचा प्रारंभ कोल्हापूर येथील अलंकार कला अकादमी फाउंडेशनच्या ‘चेटकीणीच्या बंगल्यात’ या नाटकाने झाला. त्यानंतर बहुजन एज्युकेशन सोसायटीचे डॉ. सतीश साळुंखे लिखित ‘झाले मोकळे आभाळ’, भैरवी कला अकादमी अचलपूरचे ‘अबोलांचे बोल’, छत्रपती सेवाभावी संस्था परभणीचे शेख आसिफ दिग्दर्शित ‘बेला’, सिटी हायस्कूल सांगली येथील सागर सगरे दिग्दर्शित ‘जंगल स्कूल’ आणि गोपाला फाउंडेशन परभणीचे बालाजी दामुके दिग्दर्शित ‘मोतीचूर’ ही बालनाट्ये सादर झाली. ही संपूर्ण स्पर्धा महाराष्ट्र शासनातर्फे रसिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आली आहे. दरम्यान, अमरावतीकर कला रसिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि बाल कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण स्पर्धेदरम्यान उपस्थित राहावे, असे आवाहन नाट्यस्पर्धा समन्वयक विशाल फाटे, सहसमन्वयक हर्षद ससाणे, ॲड. श्रद्धा पाटेकर आणि अमरावती नाट्य परिषदेचे अध्यक्ष ॲड. चंद्रशेखर डोरले यांनी केले आहे. या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत उद्या, रविवार, १ मार्च रोजी जळगाव, नागपूर, ओझर आणि भुसावळ येथील सहा नाटके सादर होणार आहेत. यामध्ये ‘प्रोजेक्ट त्राहीमाम’, ‘सर्कस’, ‘एक होता राजो’, ‘रामा रे’ आणि ‘हे तुम्हीही करू शकता’ या नाटकांचा समावेश आहे. नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता स्पर्धेचा प्रारंभ होईल, तर दुपारी ३ वाजता शेवटच्या नाटकाचे सादरीकरण सुरू होईल.
अमरावतीतील राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:दुसऱ्या दिवशी 6 दर्जेदार नाटकांचे सादरीकरण, प्रवेश विनामूल्य
