![]()
महाराष्ट्रात शनिवारी जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. परंतु, या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला. सोलापूरमध्ये ईव्हीएम मशीनच ढाब्यावर सापडल्याचे समोर आले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे. हे खरोखरचच धक्कादायक असल्याचे दानवे यांनी म्हटले. तसेच अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले आहे. अंबादास दानवे म्हणाले, ईव्हीएम मशीनला नेण्यासाठी एसटी असते किंवा एखादे वाहन नेमण्यात आलेले असते. ईव्हीएम मशीन ढाब्यावर सापडले आता याला कारणे काय देणार? ईव्हीएम वारंवार शंका उपस्थित होत आहे. तसेच यात निवडणूक आयोग काही तरी करून सत्ताधारी पक्षाला मदत करत असते, असा गंभीर आरोप दानवे यांनी लगावला आहे. पैठण येथे देखील एक प्रकार घडला ज्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते विलास भूमरे यांनी त्यांच्या छोट्या मुलाला मतदान कक्षापर्यंत नेले. यावरून दिवसभर टीका टिप्पणी झाली. यावर अंबादास दानवे यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले, लहान मूल आहे ते. यावर टीका टिप्पणी करणे योग्य होणार नाही. लहान मुलं कधी कधी हट्ट धरतात, बाबा मला घेऊन चला, मला शाई लावा, तशा अॅंगलने नेले असेल, असे मला वाटते. तसेच ही जबाबदारी निवडणूक अधिकाऱ्यांची आहे. विलास भूमरे यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही. निवडणूक कर्मचाऱ्यांचीच चूक आहे. संघाचे कार्यकर्ते ठराविक पक्षाचा प्रचार करतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणाले होते की संघाचे सेवक राजकारण करत आहेत. परंतु, संघ हा काही राजकीय पक्ष नाही. यावर आपले मत मांडताना अंबादास दानवे म्हणाले, हे सत्य आहे की संघ यह राजकीय पक्ष नाही. पण संघाचे सेवक राजकीय पक्षाचा प्रचार करतात, हे अतिशय खरे आहे. संघाच्या शाखेवर कोणत्या पक्षाला मतदान करायचे हे सांगितले जाते. यात नाकारण्यासारखे काही नाही. तसेच सलमान खान संघाच्या कार्यक्रमाला गेला यात काही विशेष असे काही नाही. सलमान हा देशाचा नागरिक आहे. कसे आहे, त्यांनी एखाद्या मुसलमानाला बोलावले की तो राष्ट्रवाद होतो आणि दुसऱ्या कोणी बोलावले तर धर्मवाद होतो. समजा आता शिवसेनेने कोणत्या मुसलमान व्यक्तीला बोलावले तर लगेच अरे बापरे मुसलमानाला बोलावले, त्याला धर्मवाद केला जातो. मिटकरींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर समोर आले पाहिजे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. यावरून शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यात आता पायलटचा 50 कोटींचा विमा होता, तो सुद्धा एक सूसाइड बॉम्ब असल्याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे. यावर अंबादास दानवे म्हणाले, हे बघा काही तरी आहे एवढे नक्की, पण पायलटच सुसाइड बॉम्ब आहे याला फारसे महत्त्व नाही. पण अमोल मिटकरी यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत, माणसं 6 होते तर पाचच बॉडी का सापडल्या? माणसं जळून खाक झाली तर कागद कसे कोरे करकरीत राहिले? या प्रश्नांना तर उत्तर दिलेच पाहिजे. तसेच जी घटना घडली त्याला स्वीकारले पाहिजे. महाविकास आघाडी संपली अशी चर्चा सुरू आहे. कॉंग्रेस पक्षाने देखील स्वबळावर लढण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. यावर अंबादास दानवे म्हणाले, अशा सूचना सगळेच पक्ष देत असतात. असे कोणीच म्हणत नाही की 50 च जागांची तयारी करा, सगळ्या 288 जागांची तयारी करण्याच्या सूचना असतात. त्यामुळे याला काही अर्थ नाही. आता कोणती निवडणूक समोर नाही. लोकसभेला साडे तीन वर्ष बाकी आहेत. त्यामुळे जर तरच्या गोष्टी बोलण्यात अर्थ नाही.
सोलापूरमध्ये EVM मशीन सापडली ढाब्यावर!:हे धक्कादायक, आता याला कारणे काय देणार? अंबादास दानवेंचा निवडणूक आयोगाला सवाल
