तुम्ही कुणाला साफ करण्याची धमकी देता?:संजय शिरसाट यांचा भाजपच्या मंत्र्याला सवाल; आमच्यामुळेच सत्तेत आल्याचा दिला इशारा




राज्याचे वनमंत्री तथा भाजप नेते गणेश नाईक यांनी भाजपने परवानगी दिल्यास सत्ताधारी शिवसेनेचे नामोनिशान मिटवून टाकण्याची वल्गना केली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. गणेश नाईक यांचे थोडे जास्तच होत आहे. ते साफ करण्याची धमकी कुणाला देतात? तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यामुळेच सत्तेत आलात हे विसरू नका, असे त्यांनी म्हटले आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीवेळी मुंबईत गणेश नाईक व शिंदे गटात मोठा राजकीय कलगीतुरा रंगला होता. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हा कलगीतुरा संपण्याची शक्यता होती. पण आता भाजप नेते तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा भाजपने परवानगी दिली तर शिंदे गटाचे नामोनिशान मिटवण्याचे विधान केल्यामुळे हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्र्यांकडून काय आदेश घ्यायचे ते घ्या मंत्री संजय शिरसाट त्यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेताना म्हणाले, गणेश नाईक यांचे थोडे जास्तच होत आहे. ते दरवेळी आव्हानाची भाषा करतात. त्यांनी आपले डोके ठिकाण्यावर ठेवले पाहिजे. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांमुळेच सत्तेत आलात याचा विसर पडू देऊ नका. साफ करण्याची भाषा कुणाला करत आहात? साफ करायला हे काय नवी मुंबईचे डोंगर आहेत का? की तेथील रेतीच्या खदानी आहेत? आम्ही हिंमतीने व जिद्दीने उभे राहणारे लोक आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तुम्हाला काय आदेश घ्यायचे ते घ्या. पण आम्हाला कमी समजण्याची चूक करू नका. आम्ही ऐकूण घेतो याचा अर्थ असा होत नाही की, आम्हाला काही कळत नाही. महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा आणि तु्म्ही बोलायचे हे यापुढे सहन केले जाणार नाही, असे शिरसाट म्हणाले. शिंदेंना हलक्यात घेण्याची चूक करू नका ते पुढे म्हणाले, मी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. गणेश नाईकांचे हे नेहमीचच झाले आहे. आम्ही साफ करून टाकू, उखडून टाकू, फेकून देऊ. ते कुणासाठी ही भाषा वापरत आहेत. आम्ही जो काही त्याग केला, त्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही एकनाथ शिंदेंना हलक्यात घेण्याची चूक करू नका. तुमची एवढीच ताकद असेल तर देवेंद्र फडणवीस यांना सांगा व काय निर्णय घ्यायचाय तो घेऊन टाका. आम्हीही अशीच भाषा केली तर महायुतीत मिठाचा खडा पडेल. त्यामुळे एखाद्या नेत्याबद्दल बोलताना थोडेसे भान राखायला हवे. एकनाथ शिंदे जे काही निर्णय घेतात ते शांतपणे व संयमाने घेतात. महायुतीत बिघाड होऊ नये म्हणून आम्ही आज बोलत नाही. पण महायुतीत बिघाड व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर आव्हान देत बसा. आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहोत, असेही संजय शिरसाट यावेळी गणेश नाईक यांना ठणकावत म्हणाले. आत्ता पाहू काय म्हणाले होते गणेश नाईक? वनमंत्री गणेश नाईक आज सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, भाजपने परवानगी दिली तर मी यांचे नामोनिशाण मिटवून टाकेन. मी आज हे पुन्हा बोलत आहे. भाजप हा शिस्त पाळणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाने आदेश दिला म्हणून मी ते मान्य केले. मनाला पटले नसले तरी कार्यकर्त्यांनी ते शांतपणे सहन केले. पक्ष नेतृत्वाचा निर्णय आम्ही मान्य केला. एकेकाळी मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) महायुतीमधील सर्व कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे लढू द्यावे. निवडणुकीनंतर ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून येतील त्यांना मित्र पक्षांनी पाठिंबा द्यावा व उर्वरित पदांची वाटणी करावी असे माझे मत होते. मी ही बाब मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घातली होती. त्यांनी त्यावर होकार दिला नाही आणि नकारही दिला नाही. आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा आम्हाला होती. पण काही ठिकाणी ती संधी मिळालीच नाही, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *