![]()
पुणे मनपा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस होता. यानंतर शिवसेनेने पुण्यात ११० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी शिवसेना नेते किरण साळी उपस्थित होते.
.
पक्षाच्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ उद्या (३ जानेवारी) दुपारी साडेबारा वाजता हॉटेल सेंट्रल पार्क येथे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच, ९ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील प्रचारासाठी पुण्यात येणार आहेत.
शिवसेनेने एकूण १२३ उमेदवारी अर्ज भरले होते, त्यापैकी १३ अर्ज मागे घेण्यात आले. यामुळे ११० उमेदवार आता निवडणुकीस सामोरे जात आहेत. १४ ठिकाणी पक्षाचे पॅनल पूर्ण झाले असून, अनेक जण पुरस्कृत उमेदवारीसाठी विचारणा करत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, राज्यात अनेक ठिकाणी महायुती झाली असली तरी, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये युती होऊ शकली नाही. शेवटपर्यंत युतीचा प्रयत्न केला, पण ज्या जागांवर आमचा आग्रह होता, त्याबाबत भाजपकडून कोणताही निर्णय झाला नाही.
आम्ही भाजपकडे २५ जागांची सन्मानजनक मागणी केली होती, जी अवास्तव नव्हती, पण आमचे समाधान झाले नाही. आमचे नगरसेवक स्वतःच्या पक्षात घेऊन त्या जागा स्वतःच्या सांगणे कोणत्या तत्त्वात बसत नाही. युती बिघडण्यामागे पडद्यामागे काय घडले, हे सांगता येत नाही. जो पक्ष स्वतःला ‘मोठा भाऊ’ समजतो, त्यांना मोठी भूमिका घ्यावी लागते, असेही त्यांनी नमूद केले.
युती झाली किंवा नाही, यावर निवडणुकीतील यश अवलंबून नाही. आम्ही आमच्या पक्षाचा अजेंडा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहोत. पुण्याच्या तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकाळात शहरातील प्रश्न का सुटले नाहीत, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली. लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे.
अनेक पक्षांनी गुंडांना उमेदवारी दिली आहे, पण मतदारांनी सजगपणे निर्णय घ्यावा आणि कोण मतदार हिताचे काम करत आहे, हे लोकांनी पाहिले पाहिजे. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
