गांधी पुतळा ते सिटी चौक रस्त्यावरील विश्वास ज्वेलर्समधून गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास २२ सीसीटीव्ही आणि ११ कर्मचाऱ्यांचे डोळे चुकवत ५ जणांच्या टोळीने २ किलो सोने लंपास केले. हे सोने संभाजीनगरातील गुरुवारच्या प्रति तोळा १ लाख ६३ हजार ४६१ रुपय
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी २ वाजेच्या सुमारास बुरखा घातलेली एक महिला दुकानात आली. तिने सुरुवातीला घरची मंडळी येत असल्याची थाप मारली. आणि दुकानात बसकण मारत सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. काही वेळात तिच्या सोबतच्या दोन आणखी महिला आल्या. त्या कानातले पाहिजे असल्याचे सांगून वेगवेगळ्या डिझाइन बघू लागल्या. पाच-सात मिनिटानंतर टोळीतील अन्य दोन पुरुष आले. महिलांनी मिळून जवळपास २० ते २५ मिनिटे दागिने बघितले. काही वेळाने दुसरे दागिने घेण्यासाठी सेल्समन बाजूला गेला. तेवढीच वेळ हेरून एका महिलेने काउंटरजवळ खाली बसून हात टाकत एक बॉक्स उचलून बुरख्यात लपवला आणि काही क्षणातच सर्व चोरटे दुकानातून पसार झाले.
विशेष म्हणजे, दुकानामध्ये एकूण ३६ सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे आहे तर ११ कर्मचारी कामाला आहे, हे सर्व दुकानात असताना देखील चोरी झाली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

चोरीनंतर दुकानासमोरून फेरी
दुकानात एकाच ठिकाणी काउंटरखाली स्लायडिंग तुटलेले आहे. बरोबर त्याच काउंटरजवळ महिलांनी ठिय्या मांडला. म्हणजे या दुकानाची चोरट्यांनी रेकी केलेली असणार आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, चोर महिला काउंटरखालून हात घालताना शेजारी असलेला कर्मचारी त्याच दिशेला बघतो, मात्र काही क्षणांत तो मान पलीकडच्या बाजूला वळवतो. दागिन्यांचा बॉक्स घेऊन बाहेर पडल्यावर चोरट्यांनी पुन्हा दुकानासमोरून फेरी मारली. हा चोरी पूर्ण झाल्याचा एक इशारा असू शकतो. दुकानातील कामाची पद्धत चोरट्यांना माहिती असावी असे त्यांच्या हालचाली, वागणुकीतून दिसून आले आहे.
चोरट्यांच्या शोधासाठी तीन पथके तैनात
दुपारी पाच वाजेच्या सुमारास दुकानात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, निरीक्षक निर्मला परदेशी यांच्यासह सिटी चौक पोलिसांनी दुकानांची पाहणी केली. त्यानंतर चोरट्यांच्या शोधासाठी तीन पथके तैनात करण्यात आली आहेत.
आधी गांधी पुतळ्याकडे, मग सिटी चौकातून दोन रिक्षा केल्या
दुकानातून बाहेर येताच चोरटे गांधी पुतळ्याकडे गेले. त्यांनी पुन्हा दुकानाच्या समोरून जात आतील कानोसा घेतला आणि सिटी चौकाकडे जात असताना एका रिक्षात बसले. पुढे मुख्य चौकात गेल्यावर त्यांनी दोन रिक्षा केल्या. यात एकात केवळ तीन महिला तर दुसऱ्यात दोन्ही पुरुष बसले. एक रिक्षा गुलमंडी मार्गे अमरप्रीत चौकात गेली तर दुसरी खडकेश्वर मार्गे अमरप्रीत चौकात गेले. तिथे त्यांनी दोन्ही रिक्षा सोडत दर्ग्याच्या दिशेने पळ काढला.

