![]()
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात धनकवडी-सहकारनगर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक 36 (अ) मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या दोन इच्छुक उमेदवारांमध्ये उमेदवारीवरून झालेल्या व
.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग 36 (अ) साठी शिवसेना शिंदे गटाकडून दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. बुधवारी सकाळी मच्छिंद्र ढवळे आणि उद्धव कांबळे यांच्यात यावरून जोरदार बाचाबाची झाली. ही वादावादी सुरू असतानाच, संतापलेल्या उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांच्या हातातील पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म हिसकावून घेतला आणि तो फाडून थेट तोंडात टाकून गिळून टाकला.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर कमालीचा तणाव निर्माण झाला होता. एकाच पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांमधील हा टोकाचा अंतर्गत कलह पाहून उपस्थित नागरिक आणि इतर पक्षांचे उमेदवारही अवाक झाले. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि निवडणूक प्रक्रियेत गोंधळ घातल्याप्रकरणी तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी उद्धव कांबळे यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे धनकवडी-सहकारनगर परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
निवडणुकीच्या ऐन धामधुमीत ‘एबी फॉर्म’ खाऊन टाकण्याच्या या विचित्र प्रकारामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या प्रतिमेला मोठा तडा गेला असून राजकीय वर्तुळात यावर टीकेची झोड उठत आहे. उमेदवारीवरून उफाळलेला हा अंतर्गत वाद आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला असून, या गोंधळामुळे मच्छिंद्र ढवळे यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. त्यांना निवडणूक आयोगाकडून किंवा पक्षाकडून नवीन फॉर्म उपलब्ध करून दिला जाणार की तांत्रिक कारणास्तव त्यांचा अर्ज अवैध ठरणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
पुण्यात शिवसेनेच्या अंतर्गत वादाची ही पहिलीच घटना नसून, यापूर्वी प्रभाग क्रमांक 3 मधील इच्छुक उमेदवार पद्मा शेळके यांनीही अशाच स्वरूपाचा गंभीर आरोप केला होता. पक्षाने आपल्याला अधिकृतरीत्या एबी फॉर्म दिला होता, मात्र तो अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा दावा शेळके यांनी केला होता. पुण्यात एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या एबी फॉर्म नाट्य आणि पळवापळवीच्या घटनांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पक्षांतर्गत समन्वयावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
