![]()
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून, या पराभवाचे खापर भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे कुटुंबावर फोडले आहे. एकनाथ खडसे हा माणूस आमच्यासाठी अपशकुन ठरला असल्याचे वादग्रस्त विधान गिरीश महाजन यांनी केले आहे. त्
.
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत संपूर्ण जगळाव जिल्ह्याचे लक्ष लागले होते. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे स्वतः या प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, निकालात आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील यांनी तब्बल 2,583 मतांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे. हा विजय खडसे कुटुंबासाठी मोठा राजकीय धक्का असल्याचे मानले जात आहे.
एकनाथ खडसे हा माणूस आमच्यासाठी अपशकुन ठरला
याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, एकनाथ खडसे हा माणूस आमच्यासाठी अपशकुन ठरला आहे. एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात असताना भाजपच्या व्यासपीठावर येऊन प्रचार करतात, हे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना पटले नाही. याचा थेट फटका आम्हाला बसला, असे विधान महाजन यांनी केले आहे.
खडसेंचे आता काहीही वजन उरलेले नाही
पुढे बोलताना गिरीश महाजन यांनी खडसे कुटुंबाच्या राजकीय ताकदीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, एकनाथ खडसे यांचे आता काहीही वजन उरलेले नाही. दोन वेळा त्यांची मुलगी विधानसभेत उभी राहिली, पण दोन्ही वेळा मोठ्या फरकाने पराभूत झाली. तसेच मुक्ताईनगरमध्ये भाजपची जागा गमवावी लागल्याची खंत व्यक्त करताना महाजन म्हणाले, या पराभवामागे खडसे कुटुंबच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये झालेला पराभव हा भाजपच्या जिव्हारी लागला असल्याचे दिसत आहे. भाजपमधील अंतर्गत वाद तसेच खडसे आणि महाजन यांच्यातील जुने वाद यामुळे आगामी काळात देखील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
