![]()
हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. स्थानिक निवडणुकांपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत संतोष बांगर यांनी अनेक वेळा आपली ताकद सिद्ध केली असून, या नगरपालिका निवडणुकांमधील निकालांनी त्
.
हिंगोली जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदल स्पष्टपणे दिसून आला आहे. हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या तीन नगरपालिकांमध्ये झालेल्या निवडणुकांत सत्तेची समीकरणे बदलली असून, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. विशेषतः शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेने हिंगोली आणि कळमनुरी या दोन ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. हिंगोली नगरपालिकेत भाजपकडून सत्ता हिसकावून घेत शिंदेसेनेने मोठा राजकीय संदेश दिला आहे, तर वसमत येथे राष्ट्रवादीने बाजी मारत स्वतंत्र ताकद दाखवली आहे.
हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. 17 प्रभागांतील 34 नगरसेवकपदांसाठी ही निवडणूक पार पडली होती. मतमोजणी हिंगोलीतील कल्याण मंडपम येथे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, मुख्याधिकारी अरविंद मुंडे आणि तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया राबवण्यात आली. सुरुवातीच्या पहिल्या फेरीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निता बांगर यांनी सुमारे 1200 मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे भाजप समर्थकांमध्ये आशा निर्माण झाली होती.
मात्र दुसऱ्या फेरीपासून निवडणुकीचे चित्र बदलू लागले. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेखा बांगर यांनी आघाडी कमी करत हळूहळू परिस्थिती आपल्या बाजूने वळवली. पुढील प्रत्येक फेरीत रेखा बांगर यांनी आघाडी वाढवत ठेवली आणि अखेरच्या फेरीत 10,467 मतांची निर्णायक आघाडी घेत त्यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला. या विजयासह मागील निवडणुकीत भाजपकडे असलेली हिंगोली नगरपालिकेची सत्ता शिंदेसेनेने आपल्या ताब्यात घेतली. नगरसेवक संख्येचा विचार करता शिवसेनेला 17 जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी अजित पवार गट 10, भाजप 5 आणि काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष बाब म्हणजे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाला एकही जागा मिळू शकली नाही.
बांगर कुटुंबाचे राजकीय वजन आणखी वाढले या संपूर्ण विजयामागे आमदार संतोष बांगर यांची भूमिका निर्णायक ठरल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. संघटनात्मक ताकद, प्रचारातील आक्रमकता आणि स्थानिक समीकरणांची अचूक मांडणी यामुळे शिवसेनेला हिंगोलीत यश मिळाले. रेखा बांगर या आमदार संतोष बांगर यांच्या वहिणी असून, त्यांच्या विजयामुळे बांगर कुटुंबाचे राजकीय वजन आणखी वाढले आहे. या निकालातून संतोष बांगर यांनी जिल्ह्यातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असून, आगामी निवडणुकांसाठीही त्यांनी मजबूत पायाभरणी केल्याचे चित्र दिसते.
कळमनुरी नगरपालिकेत आश्लेषा चौधरी नगराध्यक्षपद पटकावले
कळमनुरी नगरपालिकेतही शिंदेसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. 10 प्रभागांतील 20 नगरसेवकपदांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या आश्लेषा चौधरी यांनी 1,383 मतांची आघाडी घेत नगराध्यक्षपद पटकावले. त्यांना एकूण 5,635 मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या नुरुनीसा म. नाजीम यांना 4,252 मते मिळाली. कळमनुरीत शिवसेनेने 13 जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी (अजित पवार गट) 4, भाजप 2 आणि काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली आहे. मागील निवडणुकीतही येथे शिवसेनेचा नगराध्यक्ष होता, मात्र यावेळी भाजपाने दोन जागा जिंकत पालिकेत आपली उपस्थिती नोंदवली आहे.
हिंगोली जिल्ह्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीची ताकद अधोरेखित
वसमत नगरपालिकेत मात्र चित्र वेगळे दिसून आले. येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सत्ता मिळवली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनीता बाहेती यांनी 3,451 मतांची आघाडी घेत विजय मिळवला. त्यांना 20,165 मते मिळाली, तर काँग्रेसच्या सीमा हाफीज यांना 16,714 मते मिळाली. वसमत नगरपालिकेत राष्ट्रवादीला 16 जागा मिळाल्या असून काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी 4, शिंदेसेना आणि ठाकरे गट प्रत्येकी 2 जागांवर समाधान मानावे लागले. दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालांमुळे हिंगोली जिल्ह्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आपली ताकद अधोरेखित केली असून, आगामी राजकीय समीकरणांवर या निकालांचा मोठा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
