[ads1]
![]()
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांबाबत विद्यार्थी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही विद्यार्थी आणि क्लासचालकांची बैठक झाल्याचे माध्यमांतून समोर आले आहे. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा होऊन काही आश्वासने दिल्याचे सांगितले जात आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी पुण्यात आज आणि उद्या विद्यार्थ्यांसोबत खुली चर्चा घेण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, कोणत्या मागण्यांवर सरकारने काय भूमिका घेतली आणि दिलेली आश्वासने किती दिवसांत पूर्ण केली जाणार आहेत, याचा स्पष्ट खुलासा विद्यार्थ्यांसमोर व्हावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. त्यासाठी बैठकीत सहभागी झालेले विद्यार्थी आणि क्लासचालक यांनी खुल्या चर्चेत सहभागी होऊन वस्तुस्थिती सांगावी, असे त्यांनी म्हटले आहे. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी ही आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत या मागणीवर काय निर्णय झाला, याचाही स्पष्ट खुलासा करावा, अशी भूमिका पवार यांनी मांडली. ‘एमपीएससीचा प्रश्न सुटत असेल तर त्याचे स्वागतच करायला पाहिजे. हा लढा विद्यार्थ्यांनी उभा केला असून त्यात प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग आहे. त्यामुळे या बैठकीत झालेल्या चर्चेची आणि आश्वासनांची माहिती विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे,’ असे पवार यांनी म्हटले. सरकारच्या आश्वासनांबाबत विद्यार्थ्यांचे समाधान झाले तर आनंदच आहे; मात्र समाधान झाले नाही, तर आंदोलनाची पुढील दिशा विद्यार्थीच ठरवतील आणि त्यांच्या निर्णयासोबत आपण ठामपणे उभे राहू, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
[ads2]
रोहित पवार विद्यार्थ्यांसोबत घेणार खुली चर्चा:मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय ठरले? आश्वासनांच्या पूर्ततेचा मागितला खुलासा
















Leave a Reply