LIC चा पैसा मोदींच्या मित्राचा नव्हे जनतेच्या घामाचा:काँग्रेसचा 'राजेश एक्स्पोर्ट'वरून घणाघात; मित्र बचाव योजनेच्या चौकशीची मागणी
![]()
राजेश एक्स्पोर्ट नामक कंपनीच्या तब्बल 15 लाख रुपयांच्या कथित घोटाळ्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राजेश एक्स्पोर्ट्स कंपनीवर सेबीने 15 लाख कोटींचा महसूल फुगवून दाखवल्याचा आरोप केला आहे. एलआयसीने जनतेचा पैसा या कंपनीत का गुंतवला? हा पैसा मोदींच्या मित्रांचा नव्हे, तर जनतेच्या घामाचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. बंगळुरूच्या ‘राजेश एक्स्पोर्ट्स’ या नामांकित ज्वेलरी कंपनीने आकड्यांत हेराफेरी करून तब्बल 15.15 लाख कोटी रुपयांचा महसूल फुगवून दाखवल्याचा धक्कादायक खुलासा बाजार नियामक ‘सेबी’ने केला आहे. या प्रकरणी सेबीने कंपनीचे चेअरमन राजेश मेहता यांच्यावर शेअर बाजारात कोणतीही खरेदी – विक्री किंवा व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. या कंपनीत एलआयसीनेही शेकडो कोटींची गुंतवणूक केल्यामुळे सर्वसामान्यांची गुंतवणूक संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकार व एलआयसीवर उपरोक्त शब्दांत टीका केली आहे. ‘मित्र बचाव योजनेची’ चौकशी करा -सपकाळ हर्षवर्धन सपकाळ आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, राजेश एक्स्पोर्ट्स नावाच्या कंपनीवर तब्बल 15 लाख कोटी रुपयांचा महसूल फुगवून दाखवल्याचा गंभीर आरोप सेबीने केला आहे. इतकी मोठी रक्कम म्हणजे भारतात 15 बुलेट ट्रेन प्रकल्प उभे राहतील इतका पैसा! पण इथे गोष्ट राजेश मेहताची तर आहेच सोबतच आपण प्रीमियम भरत असलेल्या LICची पण आहे. जेव्हा अनेक मोठ्या गुंतवणूकदारांना या कंपनीत पैसा टाकणं धोकादायक वाटत होतं, तेव्हा LIC ने सामान्य जनतेचे शेकडो कोटी रुपये या कंपनीत का गुंतवले? LIC चा पैसा हा मोदींच्या मित्रांचा नाही, तर देशातील करोडो कुटुंबांच्या घामाच्या कमाईचा आहे. देशात एक नवीन नियमच बनला आहे. उद्योगपतींना नफा झाला तर तो त्यांचा… पण नुकसान झालं की जनतेचा पैसा पुढे केला जातो. बँका, LIC, सरकारी संस्था यांचा वापर करून मित्रांना वाचवायचं आणि त्याचं ओझं सामान्य लोकांच्या खांद्यावर टाकायचं. राजेश मेहतावर कारवाई झालीच पाहिजे, पण LIC ला या कंपनीत पैसा गुंतवायला कोणी भाग पाडलं? कोणाच्या आशीर्वादामुळे जनतेचे पैसे अशा संशयित कंपनीत गेले? या संपूर्ण ‘मित्र बचाव योजनेची’ चौकशी ही व्हायलाच पाहिजे, असे ते म्हणालेत. बंडखोर उमेदवारांची काँग्रेसमधून हकालपट्टी दुसरीकडे, काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या बंडखोर उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसने या प्रकरणी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणारे यवतमाळ मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्याने दोन्ही उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही कारवाई केली असून या दोघांचे पक्ष सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.
