राजकारणाचा चिखल करणाऱ्या नेत्यांचा माज आता जनतेनेच उतरवावा:गाड्या, पैसा असणाऱ्यांना अन् मित्रांनाच उमेदवारी, मनपाला 5-6 कोटी देत उमेदवार निवडून आणले- अमित ठाकरे
![]()
राजकारणाचा सध्या जो चिखल झाला आहे, त्याकडे आता जनतेने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. राजकीय पक्ष ज्याला उमेदवारी देतील तो जिंकेलच, हा नेत्यांचा अवाजवी आत्मविश्वास लोकांनीच आता मोडून काढला पाहिजे. जनतेमुळेच आपण तिथे खुर्चीवर बसलो आहोत, याची जाणीव आता नेत्यांना करून देण्याची वेळ आली आहे, असे म्हणत मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अमित ठाकरे एका स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधारी आणि सध्याच्या राजकीय संस्कृतीवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, ज्याच्याकडे गाड्या आहेत, अफाट पैसा आहे आणि जो पक्षातील नेत्यांचा मित्र आहे, त्यालाच सध्या उमेदवारी दिली जात आहे. लोकांना अतिशय गृहीत धरले जात असून, जनता शांत असल्यानेच या नेत्यांना एवढी मुभा मिळाली आहे. महापालिकेत काय प्रकार घडले आपण पाहिलेच आहे; 5 ते 6 कोटी रुपये देऊन उमेदवार निवडून आणले गेले. या सगळ्या प्रकारावर आपण जनता म्हणून कधी जागे होणार आहोत? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावाच ‘कॉक्रोच जनता पार्टी’बाबत पक्षाची अधिकृत भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे मांडतील, असे स्पष्ट करत अमित ठाकरे यांनी या विषयावर वैयक्तिक मत मांडले. त्यांच्या आंदोलनाने मला वैयक्तिकरीत्या नक्कीच आनंद होईल. संबंधित केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, हे माझे वैयक्तिक मत आहे, असे सांगत त्यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. ज्या दिवशी देशातील आणि राज्यातील जनता खऱ्या अर्थाने जागी होईल, त्याच दिवशी सरकारला जनतेचा धाक बसेल. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास पर्यावरण दिनाचे औचित्य साधत अमित ठाकरे यांनी विकासाच्या नावाखाली होणाऱ्या निसर्गाच्या विनाशावरही बोट ठेवले. मुंबई किंवा महाराष्ट्राचा विकास हा पर्यावरणाचा बळी देऊन होऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. याच वेळी नाशिकमध्ये होत असलेल्या वृक्षतोडीचा दाखला देत, नाशिकमधील ती जागा कोणाच्या तरी घशात घालण्यासाठीच ही वृक्षतोड केली जात आहे, असा थेट आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.
