डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा पुनर्मूल्यांकन निकाल प्रलंबित:निकाल तात्काळ जाहीर करा, भाजप विद्यार्थी आघाडीची मागणी
![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या संगणक अभियांत्रिकी विभागाच्या हिवाळी 2025 परीक्षेचा पुनर्मूल्यांकन निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यापीठाकडून पुनर्परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, पुनर्मूल्यांकनाचा निकाल प्रलंबित असल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेचा अर्ज भरावा की नाही, याबाबत निर्णय घेणे कठीण जात आहे. पुनर्मूल्यांकनानंतर गुणांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक तसेच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष विद्यार्थी आघाडीच्या वतीने विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक यांना छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये संगणक अभियांत्रिकी विभागाचा हिवाळी 2025 परीक्षेचा प्रलंबित पुनर्मूल्यांकन निकाल तात्काळ जाहीर करण्यात यावा, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल दांडगे तसेच विद्यार्थी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष शिवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विद्यार्थी महामंत्री सुमित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. पश्चिम शहराध्यक्ष गौरव जाटवे, पूर्व शहराध्यक्ष प्रसाद कोकाटे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध ढवळे, ऋषिकेश वंजारे, आदित्य काटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
