अस्मितेच्या संघर्षाची 4 दशके:दुबईचा व्यापारी बनून कर्नाटकात शिरले, बेळगावात आंदोलन; भुजबळांनी जागवल्या सीमा लढ्याच्या आठवणी
![]()
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज ४ जून १९८६ रोजी सीमाप्रश्नावरून कर्नाटकच्या बेळगावमध्ये केलेल्या ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मृतींना उजाळा दिला. छगन भुजबळ शिवसेनेत असताना मराठी अस्मिता आणि सीमाभागातील मराठी बांधवांवरील अन्यायाविरोधात लढा पुकारला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. या लढ्याला आज ४० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने छगन भुजबळ यांनी त्याकाळी केलेल्या आंदोलनाच्या आठवणी जागवल्या. १९५६ च्या राज्य पुनर्रचनेनंतर बेळगाव, कारवार, निपाणी यांसारखे मराठी भाषकबहुल भाग कर्नाटकात समाविष्ट झाले, तेव्हापासून हा प्रश्न महाराष्ट्राच्या मनातील वेदना बनला आहे. जून १९८६ मध्ये कर्नाटक सरकारने सीमाभागात कन्नड भाषेची सक्ती लादण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषकांचा आवाज दाबण्याच्या या कृतीविरोधात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आक्रमक आंदोलनाची हाक दिली होती. त्यावेळी छगन भुजबळ यांनी वेशांतर करून बेळगाव गाठत तिथे आंदोलन केले. छगन भुजबळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या काळातील ‘गनिमी काव्या’च्या आणि संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. नेमके काय म्हणाले छगन भुजबळ? छगन भुजबळ आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांवरील अन्यायाविरोधात आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी बेळगावच्या भूमीत घुमलेल्या ऐतिहासिक लढ्याला आज ४० वर्षे पूर्ण होत आहेत. कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात मराठी माणसांवर होत असलेल्या सरकारी अन्यायाविरोधात निर्भयपणे उभे राहून मराठी जनतेच्या हक्कांसाठी दिलेला तो लढा आजही तितकाच प्रेरणादायी आणि स्मरणीय आहे. अनेक दशकांनंतरही प्रश्नाची सुटका नाही “१९५६ च्या राज्य पुनर्रचनेनंतर बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर, भालकी यांसारखे मराठी भाषकबहुल भाग कर्नाटकात समाविष्ट करण्यात आले. तेव्हापासून सीमाप्रश्न हा महाराष्ट्राच्या मनातील वेदना आणि मराठी जनतेच्या न्यायाच्या लढ्याचे प्रतीक बनला. दुर्दैवाने, अनेक दशकांनंतरही या प्रश्नाची अद्याप सुटका झालेली नाही,” अशी खंत छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची हाक “जून १९८६ मध्ये सीमाभागातील मराठी बांधवांवर कन्नड भाषेची सक्ती लादण्याचा प्रयत्न झाला. मराठी भाषकांचा आवाज दाबण्याच्या या प्रयत्नाविरोधात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक आंदोलनाची हाक देण्यात आली. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून बेळगावात जाणारे सर्व मार्ग बंद केले होते. मात्र, मराठी स्वाभिमानासाठी कोणतीही अडचण आडवी येऊ नये, या निर्धाराने गनिमी काव्याची रणनीती आखण्यात आली.” दुबईचा इक्बाल शेख बनून बेळगावात एन्ट्री छगन भुजबळ म्हणाले, “मी स्वतःची ओळख लपवण्यासाठी मिशी काढून, शर्ट-पॅन्ट, गळ्यात टाय, खोटी दाढी आणि हातात सिगार घेऊन दुबईचे व्यापारी ‘इक्बाल शेख’ यांचा वेश धारण करून कर्नाटकात कूच केली. ही वेशभूषा इतकी अचूक होती की अनेक जवळच्या व्यक्तींनीही मला ओळखले नाही. मुंबईहून गोवा मार्गे बेळगावकडे जाताना पोलिसांचा ससेमिरा चुकवत अखेर बेळगावात प्रवेश करण्यात यश आले. ४ जून १९८६ च्या रात्री बेळगावात पोहोचून, दुसऱ्या दिवशी शेकडो शिवसैनिकांसह कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले.” १६ दिवसांचा कारावास आणि सहकाऱ्यांची साथ छगन भुजबळ म्हणाले, “या अनपेक्षित आणि धाडसी कृतीने कर्नाटक प्रशासन हादरून गेले. त्यानंतर धारवाड जिल्हा कारागृहात तब्बल १६ दिवस शासकीय कोठडी भोगावी लागली. या संघर्षात दगडू सकपाळ, बाबा पिंगळे, अरविंद तायडे, हेमंत मंडलिक आणि असंख्य निष्ठावंत शिवसैनिकांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली.” मराठी अस्मितेचा आवाज आजही बुलंद “आज चार दशकांनंतर त्या संघर्षाच्या आठवणी पुन्हा जाग्या होत आहेत. सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी उभा राहिलेला तो लढा केवळ एका आंदोलनाची कथा नव्हती, तर मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि न्यायासाठी दिलेल्या संघर्षाचे प्रतीक होता. मराठी माणसाच्या हक्कांचा हा आवाज आजही तितक्याच ताकदीने घुमत आहे आणि पुढेही घुमत राहील,” असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला.
