महाजन यांनी लष्करी कारवाईची तुलना अब्दालीच्या आक्रमणाशी केली:1984 मधील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ हा काळा दिवस, मारले गेले ते शहीद- गिरीश महाजन
![]()
१९८४ मध्ये सुवर्णमंदिरात शीख अतिरेक्यांविरुद्ध केलेली लष्करी कारवाई ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ म्हणजे हा काळा दिवस असून या कारवाईत आपले बंधू-भगिनी शहीद झाले, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. तसेच सुवर्णमंदिरावर झालेल्या या लष्करी कारवाईची तुलना त्यांनी अफगाण आक्रमक अहमदशहा अब्दालीच्या आक्रमणाशी करुन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींवर त्यांनी टीका केली. गेल्या शनिवारी अमृतसर जिल्ह्यातील दमदमी टकसालच्या मुख्यालयात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चा स्मृतीदिन पाळण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे महाजन हे कोणत्याही राज्य सरकारचे पहिले प्रतिनिधी ठरले आहेत. ते म्हणाले, “आमच्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार हा एक काळा दिवस आहे. आमचे भाऊ आणि बहिणी यामध्ये शहीद झाले आणि मारले गेले. शीख समुदायाच्या पवित्र स्थळावर झालेला हा ‘लष्करी हल्ला’ असल्याचे महाजन म्हणाले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जबरदस्तीने लष्कराला पंजाबमध्ये आणि या पवित्र वास्तूत पाठवले. शिखांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना कधीच शिक्षा झाली नाही, ही खूप मोठी शोकांतिका होती. मी याला अपघात म्हणणार नाही, तर हे एक जाणीवपूर्वक केलेले कृत्य होते,असा आरोप महाजन यांनी केला. काय होते ऑपरेशन ब्लू स्टार ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही १ ते १० जून १९८४ दरम्यान सशस्त्र दलांनी केलेली एक लष्करी कारवाई होती. सुवर्ण मंदिराच्या इमारतीत लपलेला खलिस्तान चळवळीचा म्होरक्या जर्नेलसिंग भिंद्रनवालेसह इतर अतिरेक्यांना हुसकावून लावणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश्य होता. या कारवाईनंतरच पंजाबमध्ये दहशतवादाला सुरुवात झाली. वक्तव्यातून पंजाबमधील निवडणुकीकडे कटाक्ष पुढील वर्षी २०२७ मध्ये पंजाब विधानसभेची निवडणूक आहे. आजपर्यंत पंजाबमध्ये भाजप कधीही सत्तेवर आलेला नाही. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करून ‘आप’ने सत्ता मिळवली होती. आता पश्चिम बंगालच्या विजयानंतर भाजपने पंजाब जिंकण्यासाठी कंबर कसली असून त्यापायीच हे वक्तव्य करण्यात आल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. महाजन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : राऊत देशाची अखंडता व सुरक्षेसाठी केलेल्या कारवाईला ‘काळा दिवस’ मानत असाल तर तुम्ही देशद्रोही आहात. त्यांचा लढा देशासाठी होता. माजी लष्करप्रमुख जनरल अरुण वैद्य यांनी त्यासाठी बलिदान दिले. महाजन यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केली.
