कमी भावात कांदा खरेदी करून साठेबाजी सुरू:निधी मिळत नसेल तर महायुतीतून बाहेर पडा; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा अब्दुल सत्तारांना थेट सल्ला
![]()
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवरून महायुती सरकारला धारेवर धरले असून, शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना थेट सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आंतरराष्ट्रीय कृषी करार शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारे असून, सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लूट करून कमी भावात कांदा खरेदी करत साठेबाजी सुरू आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला. तसेच, महायुतीमधील अंतर्गत वादावर बोट ठेवत, जर स्थानिक पातळीवर निधी मिळत नसेल आणि कोंडी होत असेल तर अब्दुल सत्तारांनी महायुतीतून बाहेर पडावे; कारण जो भाजपसोबत जातो त्याला बुडवण्याचे काम भाजपकडून नेहमीच होते, असा टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो अनेक देशांसोबत कृषी करार केला आहे तोच शेतकऱ्यांना बुडवणारा आहे. या कराराची समीक्षा झाली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना खड्यात घालण्याचे काम केले आहे.तो करार रद्द होईपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारू शकत नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सुद्धा हेच हाल सुरू आहेत. शेतकऱ्यांचे हाल सुरू आहे, त्यांच्याकडून कमी भावात कांदा विकत घेत त्याचा साठा करण्यात आला आहे. सरकारमध्ये एकाच पक्षाच्या हाती सत्ता विजय वडेट्टीवार म्हणाले की, अब्दुल सत्तारांना निधी दिला जात नसेल तर त्यांनी महायुतीसोबत राहू नये. जो भाजपसोबत गेला त्याला बुडवण्याचे काम भाजपकडून होते हे सांगण्याचा प्रयत्न जर त्यांच्याकडून होत असेल तर निर्णय काय घ्यायचा हे त्यांनी ठरवावे. या सरकारमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे. एका पक्षाच्या हाती सत्ता असल्याने इतर पक्षांना त्याचा त्रास होत आहे, म्हणून ते वेदना मांडत आहेत. ..तर शेतकरी पीकच घेऊ शकणार नाही विजय वडेट्टीवार म्हणाले की, शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांचे कर्जमाफ झाल्यानंतर वरचे पैसे भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहेत कुठे? जुने कर्ज असल्याने त्यांना नवे लोन सुद्धा मिळालेले नाही. दोन लाखाच्या आतील शेतकऱ्यांनी पैसे न भरल्याने यावर्षीचा हंगाम अडचणीत आला, निर्णय आज झाला तरी पैसे खात्यात का पडतील. त्याला किती कालावधी लागेल. खरीप हंगामानंतर पैसे मिळाले तर ते पीकच घेऊ शकणार नाही. कारण त्यांच्याकडे पैसेच नाही. कर्जमाफी हा केवळ दिखावा आहे, याचा शेतकऱ्यांना थेट काहीही फायदा नाही.प्रोत्साहन निधी आम्ही घेतलेला निर्णय आहे. त्या निर्णयावर हे सरकार 4 वर्षाने अंमजबजावणी करत आहे, यातून त्यांच्या शेतकऱ्यांबद्दल काय भावना आहेत या समजतात. गडचिरोलीतील दारू बंदी हटवली पाहिजे विजय वडेट्टीवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी मी उठवली. जगात आणि देशात दारु सुरू आहे.
ज्या राज्यांनी दारू बंदी केली त्या राज्यांनी पुन्हा दारू सुरू केली आहे. पुण्यात बनावट दारु पिल्याने अनेक जणांचा जीव गेला, तो आकडा दाबला जात आहे. गडचिरोलीत आदिवासी लोकांना मोहाच्या फुलांचा अर्क काढून पिण्याचा अधिकार आहे. इतरांसाठी तिथे दारू बंदी आहे. गडचिरोलीमध्ये औद्यौगिक वसाहत वाढत आहे. दारू बंदीमुळे काय लोकं व्यसनमुक्त होतो का? सर्व प्रगत देशात लिकर मिळते त्यामुळे धर्मराजबाबा आत्राम यांच्या गडचिरोलीतील दारू बंदी हटवली पाहिजे या मागणीला माझे समर्थन आहे.
