देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला?:तुमच्या हव्यासापोटी निर्माण वसुली व्यवस्थेमुळे महाराष्ट्र 'उडता पंजाब' झालाय – राजू शेट्टी
![]()
“सत्ता आणि हव्यासापोटी निर्माण झालेल्या वसुली व्यवस्थेमुळे महाराष्ट्र बरबाद होऊन ‘उडता पंजाब’ झाला आहे, हे आता मान्य करा. राज्यात अवैध धंद्यांचा महापूर आला असून गल्लीबोळातील बेकायदा व्यवसायांची यादीच मी तुम्हाला पाठवू शकतो,” अशा जळजळीत शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या आमदार निलेश राणे यांचा व्हिडिओ शेअर करत शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राजू शेट्टी यांनी निलेश राणे यांच्या विधानाचा दाखला देत म्हटले की, महाराष्ट्राची वाटचाल उडता पंजाबसारखी झाली आहे. या वाक्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी महाराष्ट्र बदनाम करत असल्याचे वक्तव्य करून त्याला दुजोरा दिला. होय देवाभाऊ तुमच्यासारख्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्र बदनाम नव्हे बरबाद होत आहे. तुमच्याच महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी पोलिस खात्यावर केलेले हे आरोप ऐका. एका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस जर दोन ते अडीच कोटीची कमाई करत असतील तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील परिस्थिती काय असेल याचा अंतर्मुख होवून विचार करा. पोलिसांच्या ‘वसुली’चे दर केले उघड निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका पोलिसाची कमाई दोन ते अडीच कोटी असल्याचे म्हटले होते. त्यावरुन शेट्टी यांनी राज्यातील कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांतील वसुलीचा आकडा शेकडो कोटींच्या घरात असल्याचा दावा केला. त्यांनी पोलिसांच्या हप्तेखोरीचे कथित सरासरी दरही सांगितले. मटका अड्डा: १५ ते २५ हजार रुपये प्रति महिना. अवैध दारू विक्री: १० ते १५ हजार रुपये प्रति महिना. अंमली पदार्थ (ड्रग्स): ७५ हजार ते १.५० लाख रुपये प्रति महिना. गांजा विक्री: २५ ते ५० हजार रुपये प्रति महिना. अवैध लॉज व्यवसाय: १० ते १५ हजार रुपये प्रति महिना. याप्रमाणे पोलिसांचे सरासरी दर ठरले असून ज्यांची विक्री व व्यवसाय जास्त आहेत त्यांचे दर तर गगनाला भिडलेले असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. कारवाईपूर्वीच अड्ड्यांना दिली जाते टीप राजू शेट्टी यांनी आरोप केला की, पोलिस ठाण्यातील बीट अंमलदारापासून ते जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखा आणि गुप्तचर शाखेच्या निरीक्षकांना सर्व अवैध अड्डे माहित आहेत. “एखाद्या ठिकाणी पोलिस कारवाई करणार असतील, तर त्याआधीच संबंधित मालकांना ‘टीप’ देऊन सावध केले जाते. पोलिसांच्या याच आशीर्वादामुळे अमली पदार्थ आणि अवैध धंद्यांनी तरुणाई बरबाद होत आहे,” असे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र उडता पंजाब झाल्याचे मान्य करा देवेंद्रजी तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या या “ वसुली “ व्यवस्थेमुळे महाराष्ट्र बरबाद होवून उडतां पंजाब झाला आहे हे मान्य करा. अजून गावनिहाय, शहरनिहाय कोणत्या गल्लीत काय काय अवैद्य व्यवसाय सुरू आहेत याची यादीही पाठवू शकतो.
