विधान परिषदेच्या 17 पैकी 14 ठिकाणी भाजपकडे स्पष्ट बहुमत:तरी शिवसेना-राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; युतीत जागावाटपावरून चुरस वाढली
![]()
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या आकडेवारीत भाजपचा मोठा दबदबा दिसून येत आहे. राज्यातील 17 पैकी 14 मतदारसंघांमध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेकडे फक्त एका मतदारसंघात, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 2 मतदारसंघात मजबूत आकडेवारी असल्यामुळे महायुतीत जागावाटपावरून मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमताचा आकडा आहे. या ठिकाणी शिवसेनेकडे 275 मते असून भाजपकडे 241 आणि राष्ट्रवादीकडे 149 मते आहेत. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे यांच्यासाठी मागितला जात असल्याने तणाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे पुणे आणि परभणी-हिंगोली या दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीकडे मजबूत स्थिती आहे. पुण्यात राष्ट्रवादीकडे 375 मते आहेत, तर भाजपकडे 335 आणि शिवसेनेकडे 82 मते आहेत. परभणी-हिंगोलीत राष्ट्रवादीकडे 123, भाजपकडे 111 आणि शिवसेनेकडे 74 मते आहेत. पुणे मतदारसंघामुळे महायुतीतील वाद आणखी तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी स्वतंत्रपणे मजबूत दिसत असली, तरी भाजप आणि शिवसेनेची एकत्रित मतसंख्या राष्ट्रवादीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे भाजपने पुणे जागेवर दावा ठोकला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या बदल्यात शिवसेनेकडून राष्ट्रवादीला परभणी-हिंगोली जागा देण्याची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या सगळ्या घडामोडींमुळे महायुतीतील जागावाटपाचा पेच अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपच्या वाट्याला 15 जागा, शिवसेनेला 1 आणि राष्ट्रवादीला 1 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, महायुतीतील समतोल राखण्यासाठी भाजपकडून शिवसेनेला अधिक जागा देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेने 7 जागांची मागणी केली होती. त्यानंतर भाजपकडून 5 जागांची ऑफर देण्यात आली आणि पुढे हा आकडा 6 पर्यंत नेण्याबाबत चर्चा झाली. जळगाव, नाशिक आणि रायगड या जागांवरून सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. राज्यातील प्रमुख मतदारसंघातील आकडेवारी पाहिली तर ठाण्यात भाजपकडे 431, शिवसेनेकडे 309 आणि राष्ट्रवादीकडे 18 मते आहेत. नागपुरात भाजपची सर्वाधिक ताकद दिसून येत असून पक्षाकडे 501 मते आहेत. सोलापुरात भाजपकडे 304, सांगली-सातारात 371, धाराशिव-लातूर-बीडमध्ये 379, तर छत्रपती संभाजीनगर-जालन्यात 254 मते आहेत. नाशिकमध्ये भाजपकडे 186, शिवसेनेकडे 161 आणि राष्ट्रवादीकडे 107 मते आहेत. याशिवाय भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गोंदिया, अमरावती, यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्येही भाजपची मजबूत स्थिती दिसून येत आहे. तीनही पक्षांमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तीनही पक्षांमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. जागावाटप अंतिम करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू असून अनेक इच्छुक उमेदवारांकडून लॉबिंगही सुरू आहे. भाजपचा स्पष्ट वरचष्मा असला, तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आपल्या वाट्याच्या जागा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत महायुतीतील जागावाटपावर अंतिम निर्णय काय होतो आणि कोणत्या पक्षाच्या पदरात किती जागा पडतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
