विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 नावांची यादी!:भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शहांच्या भेटीला; तर जागावाटपाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचा संताप
![]()
राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे, या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये सध्या 12-5-2 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा असून, त्यानुसार भाजप 12, शिंदेंची शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झाला नसला तरी तिन्ही पक्षांचे प्रमुख लवकरच एकत्र बैठक घेऊन जागावाटपावर शिक्कामोर्तब करणार आहेत. दरम्यान, भाजपने आपल्या कोट्यातील 12 जागांसाठी जोरदार तयारी सुरू केली असून उमेदवारांच्या नावांची प्राथमिक यादीही निश्चित केली आहे, ज्या अंतर्गत तब्बल 48 संभाव्य नावांची यादी घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्लीला रवाना होत आहेत. विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपमधील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, आगामी 2 ते 3 दिवसांत उमेदवारांची अंतिम नावे जाहीर केली जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर, विधान परिषदेच्या एकूण 12 जागांसाठी तब्बल 48 संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्लीला रवाना होत आहेत. आपल्या या दिल्ली दौऱ्यात रवींद्र चव्हाण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून, त्यांच्यासोबत या नावांवर सविस्तर चर्चा करून उमेदवारांची यादी अंतिम करणार असल्याचे समजते. 2-3 दिवसांत नावांवर शिक्कामोर्तब विधानपरिषद निवडणुकांसाठीचा महायुतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला, भाजपच्या संभाव्य उमेदवारांची नावे आणि इतर महत्त्वपूर्ण बाबींची तपशीलवार माहिती या दौऱ्यात केंद्रीय पक्ष नेतृत्वाला दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या या दिल्ली दौऱ्यातच भाजपच्या 12 उमेदवारांची नावे अंतिम केली जाणार असून, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 1 जूनपर्यंतचीच मुदत असल्याने पुढील 2 ते 3 दिवसांत या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. जेणेकरून नावे निश्चित होताच संबंधित उमेदवारांना तातडीने निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश पक्षाकडून दिले जातील. जागवाटपाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे संतापले विधानपरिषद निवडणुकांच्या जागावाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांशी एकनाथ शिंदे यांची अनेकदा सविस्तर चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांनी यासाठी दिल्ली वारी करूनही या निवडणुकीच्या जागावाटपावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही, असेच चित्र सध्या दिसत आहे. याच राजकीय तणावातून की काय, आज जागावाटपाच्या मुद्द्यावरून विचारलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे पत्रकारांवर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. विधान परिषदेच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे जेव्हा पत्रकारांसमोर आले, तेव्हा त्यांना पहिलाच प्रश्न या बैठकीबाबत विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकताच त्यांचा संताप अनावर झाला आणि “कुठलं बोलणार… काय आहे?” असा उलट सवाल करत ते पत्रकारांवर प्रचंड संतापले. त्यांची ही बदललेली देहबोली आणि संताप पाहता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले असून, या बैठकीत नेमके काय घडले, याबाबत आता मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
