चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा एल्गार!:शेतकरी मरतोय अन् सत्ताधारी जागावाटपात व्यस्त!- रोहित पवार, सरकारने कांदा खरेदीची पावती दाखवावी- अंबादास दानवे
![]()
चांदवड इथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी क्रांती मोर्चा काढला आहे. यामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. तीन हजार रुपये दराने शासकीय कांद्याची खरेदी करावी आणि विक्री झालेल्या कांद्याला पंधराशे रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान या आंदोलनावेळी बोलताना उबाठाचे अंबादास दानवे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांसह आंदोलक करत आहोत. सरकारने भावा काहीही जाहीर करू द्या, पण खरेदी काही झालेली नाही. केवळ घोषणेला काही अर्थ नाही. सरकारने एखाद्या शेतकऱ्याला भाव दिल्याची पावती दाखवावी. कांद्याला किमान 24 रुपये भाव द्यावा रोहित पवार म्हणाले की, आजच्या मोर्चाचे नेतृत्व हे सामान्य शेतकरी करत आहेत. आम्ही केवळ शेतकऱ्यांच्या मोर्च्यामध्ये उपस्थित आहोत. आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले आहे. 2023 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, कांद्याला 24 रुपये भाव देऊ आता निवडणूक झाल्यावर तुम्ही 12 रुपयांवर भाव देऊ म्हणतात. मग आम्ही आंदोलन केल्यावर साडेपंधरे रुपये रेट जाहीर केला पण यानेही काही फरक पडणार नाही. त्यामुळे दर वाढवण्यात यावा अशी आमची मागणी आहे, नाफेडने खरेदी वाढवली पाहिजे. नाफेडने कांदा भारताबाहेर विकला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांने आतापर्यत कांदा दिला त्यांना 10 रुपये अनुदान दिले पाहिजे. शेतकऱ्यांचा निम्मा खर्च सुद्धा आता निघत नाही. अवकाळी पाऊस, गारपीठ यामुळे शेतकऱ्यांना 18 ते 19 रुपये किलो उत्पादन खर्च आहे. त्यामुळे कांद्याला किमान 24 रुपये तरी भाव द्यावा, शेतकऱ्यांनी जगावे कसे? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. सत्ताधारी विधान परिषदेच्या जागेसाठी परेशान रोहित पवार म्हणाले की, शेतकरी मरतोय आणि सत्ताधारी पक्षाचे नेते विधान परिषदेची कोणती जागा कोणाला सोडायची यावर चर्चा करत आहेत. सत्तेतील नेते विधान परिषदेच्या मागे लागले आहेत. शेतकरी जगावा यासाठी जी मदत करावी लागेल ती केली पाहिजे. शेतकरी सर्वच बाजूने संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने कोणीतरी उभे राहिले पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
