गुन्हेगारी थांबवता येईना अन् गरिबांचे धंदे बंद करताय:पुण्यात रात्री 10 नंतर दुकानबंदीच्या निर्णयावर सुप्रिया सुळे संतापल्या

0
dbbreakingnewsfinal-61725292055-1_1779776520.jpg




खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिस प्रशासनाने लागू केलेल्या रात्रीच्या निर्बंधांवरून सरकार आणि प्रशासनावर कडाडून हल्ला चढवला आहे. पुण्यात चौदा दिवसांचे प्रतिबंधात्मक आदेश लागू करत रात्री 10 नंतर खाऊ गल्ल्या, फेरीवाले आणि छोट्या व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत, 24 तास धावणाऱ्या या शहरात हातावर पोट असणाऱ्या गरीब व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलिस प्रशासन नेमकं काय सिद्ध करू पाहतंय? असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शहरातील महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कोयता गँगचा धुमाकूळ, गोळीबार आणि लूटमारीच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. मूळ गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरलेले पोलीस केवळ सणासुदीच्या काळातच गरिबांचे धंदे बंद करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस आयुक्तांच्या तांत्रिक दाव्यांचा समाचार घेताना, “हा प्रकार आजारापेक्षा उपचार भयंकर” असल्याची सणसणीत चपराक त्यांनी लगावली आहे. सुळेंचे नेमके ट्विट काय? सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी /प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री 10 वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या 24 तास काम करणारे शहर झाले आहे. या शहरात हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलिस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय? असा सवाल त्यांनी केला आहे.
कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एकतर पुण्यातली वाढती गुन्हेगारी थांबविण्यात पोलिसांना अद्याप किंचितही यश आलेले नाही. शहरात गुन्हेगारी सतत वाढत असून महिलांना, बालकांना सुरक्षित वातावरण पोलिस देऊ शकत नाहीत. कोयता गँग रोज नव्या ठिकाणी धुमाकूळ घालत आहे.गोळीबाराच्या, लूटमारीच्या, दहशत माजविल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अशा परिस्थितीत छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद करुन पोलिस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहत आहेत? असा सवाल सुळे यांनी केला आहे. नेमका प्रतिबंध कशाला? सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पोलिस आयुक्त, जमाबंदी नाही प्रतिबंधात्मक आदेश असं म्हणत आहेत. जर हे असं असेल तर नेमका प्रतिबंध कशाला आहे? महत्वाचे म्हणजे फक्त सणांच्या काळातच पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेला नेमका कसा धक्का लागणार आहे ? हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार आहे असे सुळेंनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed