अमरावती पाणपोई: रोज ३५ हजार नागरिकांना पाणी, दिव्यांगांना रोजगार:३७ वर्षांपासून अविरत सेवा; २ जुलैला समारोप

0
d83f242c-a28e-4d4a-a0cd-d1e3c3a14a8c_1779725765652.jpg




अमरावती शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पाणपोई उन्हाळ्यात हजारो प्रवाशांसाठी मोठा आधार ठरत आहे. सायन्स कोर मैदानासमोरील ही पाणपोई गेल्या ३७ वर्षांपासून अविरत सेवा देत आहे. दररोज सुमारे ३५ ते ४० हजार नागरिक या पाणपोईवरून आपली तहान भागवतात. विशेष म्हणजे, या माध्यमातून दिव्यांग बांधवांना रोजगाराचा आधारही मिळाला आहे. १००८ संत श्री. सितारामदासजी बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ही सेवा दिली जाते. या पाणपोईच्या स्थापनेमागे एक प्रेरणादायी कथा आहे. प.पू. सितारामदासजी महाराज यांनी त्यांच्या मंदिरातील दानपेटीतील निधीतून काहीतरी विधायक कार्य करण्याची इच्छा प्रसिद्ध कापड व्यावसायिक चुन्नीलालजी मंत्री यांच्याकडे व्यक्त केली होती. चुन्नीलालजी मंत्री यांना व्यवसायाच्या निमित्ताने अहमदाबादला ये-जा करताना मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याचे जाणवले होते. याच गरजेतून त्यांनी पाणपोईची संकल्पना प्रत्यक्षात आणली. सुरुवातीला केवळ ५ रांजणांसह सुरू झालेल्या या पाणपोईचे स्वरूप आता खूप मोठे झाले आहे. सध्या येथे तब्बल १०८ रांजणांच्या माध्यमातून थंडगार पाणी पुरवले जाते. यासाठी दररोज किमान १५ हजार लिटर पाण्याची व्यवस्था केली जाते. केवळ पाणीच नव्हे, तर येथे दररोज सकाळी श्री हनुमान चालिसाच्या पठणानंतर महाप्रसाद आणि दुपारी थंडगार सरबताचेही वितरण केले जाते. दररोज सुमारे ८०० नागरिक व प्रवासी या प्रसाद आणि सरबताचा लाभ घेतात. चुन्नीलालजी मंत्री यांच्या निधनानंतर, गोपालदास रामबिलासाजी राठी (रा. सायत) यांनी या समाजसेवेची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. सध्या या मुख्य केंद्रासह राजापेठ आणि पंचवटी येथेही पाणपोईच्या माध्यमातून सेवेचा हा वारसा विस्तारला आहे. या संपूर्ण उपक्रमात सुमारे ४० स्वयंसेवक वेगवेगळ्या वेळेत आपली सेवा देतात. या पाणपोईचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे केवळ तहानच भागवली जात नाही, तर सामाजिक बांधिलकी म्हणून एका अंध महिलेला आणि दोन मुकबधिर तरुणांना रोजगार देण्यात आला आहे. यामुळे या दिव्यांग बांधवांना स्वावलंबी जगण्यासाठी मोठा आधार मिळाला आहे. या पाणपोईची सेवा दरवर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होते आणि २ जुलैपर्यंत अखंड सुरू राहते. २ जुलै हा संस्थापक चुन्नीलालजी मंत्री यांचा जन्मदिवस असल्याने, त्या दिवशी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून या सेवा उपक्रमाची सांगता केली जाते, अशी माहिती तीर्थस्वरूप पाणपोई, अमरावतीचे संचालक गोपालदास रामबिलास राठी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed