मोझरीचे जनार्धन बोथे यांना 'पद्मश्री' पुरस्कार:राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे माजी सचिव सन्मानित

0
5b539192-abbb-4b72-b0de-f72babf05ddd_1779727264817.jpg




अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील ज्येष्ठ समाजसेवक जनार्धन बापूराव बोथे (बोथे गुरुजी) यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे माजी खाजगी सचिव म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा दिली आहे. या सन्मानामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या पुरस्कारामुळे केवळ जिल्ह्याचाच नव्हे, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा आणि ‘ग्रामगीते’चा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाल्याची भावना व्यक्त होत आहे. तिवसा जवळील मोझरी गावात एका सामान्य कुटुंबात जनार्धन बोथे यांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबाची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारधारेवर नितांत श्रद्धा होती. बोथे गुरुजींनी राष्ट्रसंतांचे खाजगी सचिव म्हणून दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली. राष्ट्रसंतांच्या महासमाधीनंतर बोथे गुरुजींनी ‘ग्रामगीता’ हाच आपल्या कार्याचा आधार बनवला. त्यांनी आयुष्यभर ग्रामगीतेतील विचारांतून प्रेरणा घेऊन स्वच्छता आणि व्यसनमुक्तीची चळवळ उभारली. ८०० हून अधिक महिला बचत गटांना सक्षम करून त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. वृक्षारोपण आणि जलसंधारणाच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. ग्रामीण व दुर्गम भागातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून, बोथे गुरुजींनी १९७२ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे त्यांनी दुर्गम व आदिवासी भागांमध्ये ११ निवासी विद्यालये आणि वसतिगृहे सुरू केली आहेत, ज्यामुळे हजारो गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. बोथे गुरुजींना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण अमरावती जिल्हा, विशेषतः तिवसा आणि मोझरी परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. हा पुरस्कार म्हणजे एका व्रतस्थ सामाजिक कार्यकर्त्याचा आणि राष्ट्रसंतांच्या मानवतावादी विचारांचा गौरव असल्याचे मत सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. बोथे गुरुजींचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. त्यांनी राष्ट्रसंतांच्या नेतृत्वात झालेल्या ऐतिहासिक ‘किसान रेल्वे यात्रेत’ सक्रिय सहभाग घेतला होता. १९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान, सीमेवरील भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी राष्ट्रसंतांनी पाठवलेल्या भक्त दलातही त्यांचा समावेश होता. त्यांनी सीमेवर जाऊन सैनिकांना धीर दिला आणि देशाप्रती ऊर्जा निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed