बीडमध्ये शाही लग्नातील बडेजाव बेतला जिवावर:फटाक्यांच्या आतिषबाजीत 5 फोटोग्राफर्स गंभीर जखमी, विनापरवाना, अप्रशिक्षित इव्हेंट कंत्राटदारांवर कारवाई करा, भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
![]()
विवाह सोहळ्यांमध्ये श्रीमंतीचे प्रदर्शन आणि बडेजाव करण्याच्या नादात साध्या सुरक्षेच्या नियमांनाही पायदळी तुडवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात समोर आला आहे. एका शाही विवाह सोहळ्यात झालेल्या प्रचंड फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 5 फोटोग्राफर्स गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका फोटोग्राफरचा अवघ्या तीन दिवसांवर विवाह होता. मिळालेल्या माहितीनुसार लग्न समारंभ, वाढदिवस आणि विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हौस म्हणून उडवली जाणारी शोभेची दारू आणि फटाके आता नागरिकांच्या जीवावर उठू लागले आहेत. बीड शहरातील एका विवाहसोहळ्या दरम्यान निकृष्ट दर्जाच्या शोभेच्या फटाक्यांचा अचानक स्फोट होऊन फोटोग्राफर अविनाश गोरख कदम हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात त्यांच्या शारीरिक हानीसोबतच सुमारे 4 ते 5 लाख रुपयांच्या कॅमेऱ्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, विनापरवाना आणि अप्रशिक्षित इव्हेंट कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष अशोक लोढा यांनी केली आहे. विवाह सोहळा सुरू असताना तेथील अप्रशिक्षित इव्हेंट कंत्राटदाराने निष्काळजीपणाने निकृष्ट दर्जाचे फटाके आणि तोफांचा वापर केला. हे फटाके अचानक उलटल्याने ते थेट शूटिंग करत असलेल्या फोटोग्राफर अविनाश कदम यांच्यावर येऊन फुटले. यामध्ये ते गंभीर भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, हा अपघात झाल्यानंतर संबंधित मंगल कार्यालय (लॉन्स) चालक, इव्हेंट कंत्राटदार किंवा ज्यांचा विवाह सोहळा होता, त्या दोन्ही पक्षांपैकी कोणीही जखमी फोटोग्राफरची साधी विचारपूसही केली नाही किंवा आर्थिक मदत देण्याची तसदी घेतली नाही. आजकाल बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर किंवा गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरे करताना अशा धोकादायक शोभेच्या दारूचा सर्रास वापर केला जातो. या निकृष्ट दर्जाच्या चायनीज फटाक्यांमुळे आणि तोफांमुळे सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणी कधीही मोठा अनर्थ घडून प्रवाशांचा जीव जाऊ शकतो, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. ‘फोटोग्राफर आक्रमक या गंभीर प्रकारानंतर भाजप शहराध्यक्ष अशोक लोढा यांच्या नेतृत्वाखाली ‘बीड फोटोग्राफर असोसिएशन’चे पदाधिकारी,जखमी अविनाश कदम यांचे नातेवाईक आणि संतप्त नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व निवेदन दिले. या केल्या मागण्या बीड शहर व जिल्ह्यात विनापरवाना आणि निकृष्ट दर्जाची शोभेची दारू, फटाके विकणाऱ्यांवर तात्काळ छापे टाकावेत, कसलाही परवाना नसलेल्या आणि सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या अप्रशिक्षित इव्हेंट कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायमचे निर्बंध लादावेत, मंगल कार्यालयांमध्ये अशा फटाक्यांच्या वापराबाबत कडक नियमावली जाहीर करावी.
