शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक पुन्हा घ्या:धर्मादाय उपायुक्तांचे आदेश, निवडणूक अधिकाऱ्यावर पक्षपाताचा आरोप
![]()
अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या २०२२ मधील पदाधिकाऱ्यांची निवड अनियमित असल्याचे धर्मादाय उपायुक्तांनी म्हटले आहे. त्यामुळे संस्थेची निवडणूक पुन्हा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे संस्थेच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या निवडणुकीतील अध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, विधानसभेचे माजी उपसभापती प्रा. शरद तसरे आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. उपायुक्त राजेश इंगोले यांच्या न्यायालयाने नव्या निवडणुकीसाठी ३० दिवसांच्या आत मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. १५ मे रोजी हा निकाल जाहीर झाला असून, त्यानुसार १४ जूनपर्यंत नवी मतदार यादी तयार करून त्यानंतर रितसर निवडणूक घेतली जाईल. धर्मादाय उपायुक्तांनी संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे ज्येष्ठ सदस्य हेमंत काळमेघ यांच्या उमेदवारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या विधानानुसार, काळमेघ नागपूर येथील एका संस्थेचे विश्वस्त असल्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेसाठी ते केवळ एक मतदार आहेत. ‘शिवाजी’च्या उपविधीनुसार त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार नाही. यामुळे त्यांचे सध्याचे पद आणि भविष्यातील उमेदवारी अडचणीत आली आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्था हा नोंदणीकृत न्यास असून, त्याचा नोंदणी क्रमांक एफ ८९ आहे. संस्थेच्या कार्यकारी परिषदेसाठी सप्टेंबर २०२२ मध्ये निवडणूक झाली होती. तत्कालीन सचिव विजय ठाकरे यांनी विजयी पदाधिकाऱ्यांबाबतचा बदल अर्ज (चेंज रिपोर्ट) धर्मादाय उप-आयुक्त यांच्या न्यायालयात दाखल केला होता. हा बदल अर्ज आता फेटाळण्यात आला असून, पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. २०२२ च्या निवडणुकीत ॲड. बी. के. गांधी हे निवडणूक अधिकारी होते. त्यांनी तटस्थ भूमिका न घेता विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या बाजूने कौल दिला, असा विरोधकांचा आरोप आहे.
