आई रागावल्याने पाच भावंडे घरातून पळाली:पुणे पोलिसांनी तात्काळ घेतला शोध, मुले पुन्हा पालकांच्या ताब्यात

0
cf6c00a1-e63b-44a8-8328-b62c116ba006_1779520386976.jpg




आई रागावत असल्याने पाच भावंडांनी घरातून पलायन केल्याची धक्कादायक घटना मांजरी भागात घडली. पैसे संपल्यानंतर मुले स्वारगेट बसस्थानकात थांबली होती. त्यानंतर पालकांना याबाबतची माहिती मिळाली. पोलीस आणि पालकांनी मुलांना सुखरूप ताब्यात घेतले. अचानक एकाच घरातील पाच मुले गायब झाल्याने खळबळ उडाली होती. मुले बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या आईने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांचे आई-वडील सिंहगड रस्ता परिसरात राहतात. ते मोलमजुरी करतात. फिर्यादी महिलेची नणंद हडपसरमधील मांजरी भागात राहते. उन्हाळी सुट्टीनिमित्त फिर्यादी महिलेच्या तीन मुली आणि दोन मुले मांजरी परिसरात आली होती. आई रागावत असल्याने मुलांनी घरातून पसार होण्याचे ठरविले. वसतिगृहात शिकून आपण मोठे होऊ, असे मुलांनी ठरविले. मुले रिक्षाने स्वारगेट बसस्थानकात आले. स्वारगेट बसस्थानकात आल्यानंतर त्यांच्याकडील पैसे संपले होते. त्यामुळे भीती वाटल्याने बसस्थानकातील एका व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावरुन त्यांनी आई-वडिलांना या प्रकाराची माहिती दिली. स्वारगेट बस स्थानकात पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुले बेपत्ता झाल्यानंतर आई-वडील मांजरी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मुलांनी संपर्क साधल्यानंतर आई-वडील पोलिसांसह स्वारगेट बसस्थानकात पोहोचले. त्यानंतर बाल कल्याण समितीकडे पोलिसांनी नेले. समितीने मुलांकडे विचारणा केली. आई-वडिलांकडून कोणताही त्रास होत नसल्याचे मुलांनी सांगितले. त्यानंतर मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. स्वारगेट पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed